Headlines

Ghatkopar Landslide Arif Shaikh Family of Four arrived in Mumbai days ago for fresh start killed; डोळ्यात स्वप्नं घेऊन आले, बहिणीच्या परिवारासह मुंबई फिरले, नियतीचा क्रूर घाला, चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवट


Ghatkopar Landslide Uttar Pradesh Family dies : नव्याने आयुष्य सुरु करण्याच्या आशेने अवघ्या चार दिवसांपूर्वीच चौकोनी कुटुंब मुंबईत आले होते. मात्र आज मला माझ्या मुलाचे, सुनेचे आणि दोन नातवंडांचे शव घेऊन परत जावे लागत आहे, अशा शोकाकुल भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केल्या

Mumbai Family Ghatkopar Landslide Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उत्तर प्रदेश येथून मुंबईत आलेले आरिफ शेख , त्यांची पत्नी मरजीना, दोन वर्षांचा मुलगा अबान आणि चार वर्षांची मुलगी मन्नत यांचा घाटकोपरमधील दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. हे कुटुंब पंधरा दिवसांसाठी मुंबईत आले होते. शीव येथे नातलगांच्या घरी राहिल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ते गौशिया चाळीतील पत्नीच्या बहिणीजवळ राहायला आले होते. तिने त्यांना एक खोली मिळवून दिली होती. आरिफच्या कुटुंबाने तिथे जेमतेम एक रात्र काढली आणि दुसऱ्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवट

घाटकोपरमधील दरड कोसळण्याच्या घटनेत या संपूर्ण कुटुंबाचा बळी गेला. नव्याने आयुष्य सुरु करण्याच्या आशेने अवघ्या चार दिवसांपूर्वीच ते मुंबईत आले होते. व्यवसायाने शिंपी असलेले आरिफ शेख हे आपली पत्नी मरजीना, चिमुरडी मुलं मन्नत आणि अबान यांच्यासह घाटकोपर (पश्चिम) येथील अशोक नगरमध्ये राहायला आले होते. मरजीनाची बहीण आधीपासूनच या परिसरात राहत होती.

Maharashtra TimesNagpur Accident : मित्राच्या बर्थडेला निघाले, स्पीड वाढवला अन् घात झाला, दोघा मित्रांचा करुण शेवट, कार चालकाचे वडील गोत्यात

शोकाकुल पिता

टिटवाळा येथे राहणारे त्याचे वडील मोहम्मद अली हे राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राबाहेर दुःखात बुडालेले होते. “आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होईल या आशेने मी माझ्या मुलाला मुंबईला बोलावले होते. आज मात्र मी माझ्या मुलाचे, सुनेचे आणि दोन नातवंडांचे शव घेऊन परत जात आहे” असे ते शोकाकुल अवस्थेत म्हणाले.

मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे असलेले हे कुटुंब चांगल्या आयुष्याच्या आणि मुलांच्या सुरक्षित भविष्याच्या शोधात मुंबईत आले होते. नातेवाईकांनी सांगितले की, आरिफला काम मिळण्याबाबत आशा होती आणि कुटुंबासाठी चांगले आयुष्य घडवण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. त्याची पत्नी गृहिणी होती, मात्र तीही पतीला आर्थिक मदत करण्यासाठी काहीतरी छोटे-मोठे काम करण्याच्या विचारात होती.

Maharashtra TimesMumbai News : मुंबईकरांसाठी नव्या प्रवासाचा आरंभ, मेट्रो 2B चे लोकार्पण, तर WEH ला BKC शी थेट जोडणारा शीव-चेंबूर लिंक रोड खुला

मुंबईत फिरलो, काही दिवसातच अघटित

मरजीनाची बहीण रुबिना हिने सांगितले की, त्यांचं कुटुंब आपल्या नवीन आयुष्यात स्थिरावू लागले होते, तितक्यातच ही शोकांतिका घडली. “मी आणि आरिफची बहीणही याच परिसरात राहत असल्याने त्यांनी इथेच एक छोटी जागा भाड्याने घेतली होती. ते आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही त्यांना मुंबई शहर फिरवले होते. काही दिवसांतच आम्ही त्या चौघांनाही गमावून बसू, याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती,” असे ती म्हणाली.

रुबिनाचे पती खुर्शीद हे चित्रपटांच्या शूटिंगच्या ठिकाणी काम करतात. त्यांनी आरिफला मुंबईला बोलावले होते आणि टेकडीजवळ कमी भाड्याने घर मिळवून देण्यात मदत केली होती. “नव्याने सुरुवात करण्याची अनेक स्वप्नं घेऊन ते इथे आले होते” असे त्यांनी सांगितले.

छप्पर गमावले…

दुसरीकडे, मूळच्या उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दिलबहार खान यांना पती आणि दोन मुलांसह राजावाडी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. घाटकोपरमधील दरड कोसळून झालेल्या अपघातातून त्या थोडक्यात वाचल्या. ‘रात्री आमच्या पायावर एक वीट पडली, जाग आल्यानंतर मुलाला घेऊन बाहेर धावले. जीव वाचला, पण डोक्यावरचे छप्पर गमावले…’ अशी भावना ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या दिलबहार यांनी व्यक्त केली.

Maharashtra TimesVile Parle Fire : मरण डोळ्यासमोर तरी कर्तव्य विसरली नाही, फ्लॅटला आग, घरकाम करणाऱ्या अंकिताची चिमुकल्या अबीरसाठी धाव, दोघांचाही वेदनादायी अंत

‘तो माझा आधार होता’

‘कुटुंबाला मिळावा आधार म्हणून मोसमानुसार फळे विकून आम्ही संसाराचा गाडा रेटत होतो. माझा मुलगा मोहम्मदही मला मदत करायचा. अवघा १४ वर्षांचा होता तो; पण खूप समंजस आणि लाघवी. एखाद्या दिवशी चार पैसेही मिळाले नाहीत, तर तोच माझी समजूत काढायचा. माझा आधार व्हायचा. आता कुणाकडे पाहू?’, असे सांगताना मोहम्मद च्या वडिलांना अश्रू अनावर झाले. घाटकोपर दरड दुर्घटनेत १४ वर्षांच्या मोहम्मदचाही करुण अंत झाला.