Ghatkopar Landslide Arif Shaikh Family of Four arrived in Mumbai days ago for fresh start killed; डोळ्यात स्वप्नं घेऊन आले, बहिणीच्या परिवारासह मुंबई फिरले, नियतीचा क्रूर घाला, चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवट
Ghatkopar Landslide Arif Shaikh Family of Four arrived in Mumbai days ago for fresh start killed; डोळ्यात स्वप्नं घेऊन आले, बहिणीच्या परिवारासह मुंबई फिरले, नियतीचा क्रूर घाला, चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवट
Ghatkopar Landslide Uttar Pradesh Family dies : नव्याने आयुष्य सुरु करण्याच्या आशेने अवघ्या चार दिवसांपूर्वीच चौकोनी कुटुंब मुंबईत आले होते. मात्र आज मला माझ्या मुलाचे, सुनेचे आणि दोन नातवंडांचे शव घेऊन परत जावे लागत आहे, अशा शोकाकुल भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केल्या
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उत्तर प्रदेश येथून मुंबईत आलेले आरिफ शेख , त्यांची पत्नी मरजीना, दोन वर्षांचा मुलगा अबान आणि चार वर्षांची मुलगी मन्नत यांचा घाटकोपरमधील दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. हे कुटुंब पंधरा दिवसांसाठी मुंबईत आले होते. शीव येथे नातलगांच्या घरी राहिल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ते गौशिया चाळीतील पत्नीच्या बहिणीजवळ राहायला आले होते. तिने त्यांना एक खोली मिळवून दिली होती. आरिफच्या कुटुंबाने तिथे जेमतेम एक रात्र काढली आणि दुसऱ्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवट
घाटकोपरमधील दरड कोसळण्याच्या घटनेत या संपूर्ण कुटुंबाचा बळी गेला. नव्याने आयुष्य सुरु करण्याच्या आशेने अवघ्या चार दिवसांपूर्वीच ते मुंबईत आले होते. व्यवसायाने शिंपी असलेले आरिफ शेख हे आपली पत्नी मरजीना, चिमुरडी मुलं मन्नत आणि अबान यांच्यासह घाटकोपर (पश्चिम) येथील अशोक नगरमध्ये राहायला आले होते. मरजीनाची बहीण आधीपासूनच या परिसरात राहत होती.
टिटवाळा येथे राहणारे त्याचे वडील मोहम्मद अली हे राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राबाहेर दुःखात बुडालेले होते. “आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होईल या आशेने मी माझ्या मुलाला मुंबईला बोलावले होते. आज मात्र मी माझ्या मुलाचे, सुनेचे आणि दोन नातवंडांचे शव घेऊन परत जात आहे” असे ते शोकाकुल अवस्थेत म्हणाले.
मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे असलेले हे कुटुंब चांगल्या आयुष्याच्या आणि मुलांच्या सुरक्षित भविष्याच्या शोधात मुंबईत आले होते. नातेवाईकांनी सांगितले की, आरिफला काम मिळण्याबाबत आशा होती आणि कुटुंबासाठी चांगले आयुष्य घडवण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. त्याची पत्नी गृहिणी होती, मात्र तीही पतीला आर्थिक मदत करण्यासाठी काहीतरी छोटे-मोठे काम करण्याच्या विचारात होती.
मरजीनाची बहीण रुबिना हिने सांगितले की, त्यांचं कुटुंब आपल्या नवीन आयुष्यात स्थिरावू लागले होते, तितक्यातच ही शोकांतिका घडली. “मी आणि आरिफची बहीणही याच परिसरात राहत असल्याने त्यांनी इथेच एक छोटी जागा भाड्याने घेतली होती. ते आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही त्यांना मुंबई शहर फिरवले होते. काही दिवसांतच आम्ही त्या चौघांनाही गमावून बसू, याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती,” असे ती म्हणाली.
रुबिनाचे पती खुर्शीद हे चित्रपटांच्या शूटिंगच्या ठिकाणी काम करतात. त्यांनी आरिफला मुंबईला बोलावले होते आणि टेकडीजवळ कमी भाड्याने घर मिळवून देण्यात मदत केली होती. “नव्याने सुरुवात करण्याची अनेक स्वप्नं घेऊन ते इथे आले होते” असे त्यांनी सांगितले.
छप्पर गमावले…
दुसरीकडे, मूळच्या उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दिलबहार खान यांना पती आणि दोन मुलांसह राजावाडी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. घाटकोपरमधील दरड कोसळून झालेल्या अपघातातून त्या थोडक्यात वाचल्या. ‘रात्री आमच्या पायावर एक वीट पडली, जाग आल्यानंतर मुलाला घेऊन बाहेर धावले. जीव वाचला, पण डोक्यावरचे छप्पर गमावले…’ अशी भावना ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या दिलबहार यांनी व्यक्त केली.
‘कुटुंबाला मिळावा आधार म्हणून मोसमानुसार फळे विकून आम्ही संसाराचा गाडा रेटत होतो. माझा मुलगा मोहम्मदही मला मदत करायचा. अवघा १४ वर्षांचा होता तो; पण खूप समंजस आणि लाघवी. एखाद्या दिवशी चार पैसेही मिळाले नाहीत, तर तोच माझी समजूत काढायचा. माझा आधार व्हायचा. आता कुणाकडे पाहू?’, असे सांगताना मोहम्मद च्या वडिलांना अश्रू अनावर झाले. घाटकोपर दरड दुर्घटनेत १४ वर्षांच्या मोहम्मदचाही करुण अंत झाला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा