Headlines

Dhule Woman Ends Life With Two Children Due To Torture By In Laws; तुला पोलिस बनलेलं पाहायचंय; स्वप्न पूर्ण करण्यापूर्वीच बहीण गेली, दोन चिमुरड्यांसह महिलेने जीव दिला


Dhule Woman Ends Life With Children: दिवाळीला बहीण घरी आली, भाऊबीज साजरी केली, पण भावाला काय माहिती होतं की ही भाऊबीज त्याची बहिणीसोबतची अखेरची भाऊबीज असेल.

dhule news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे: दिवाळीला मुलासोबत माहेरी आलेल्या गायत्रीने भाऊबीजेला आपल्या एकुलत्या भावाला प्रेमाने औक्षण केले. हसण्या-खेळण्यात गायत्री इतरांसारखी सामान्य दिसत होती. परंतु सासरी गेल्यावर पती व सासऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाचं कोडं सुटू शकत नसल्याने तिने शुक्रवारी (14 नव्हेंबर) रात्री आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले. भावासाठी यंदाच्या भाऊबीजेचा टिळा अखेरचा ठरला.

निकुंभे शिवारात पती, सासू सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गायत्री पाटील या हतबल मातेने आपल्या 5 वर्षांच्या दुर्गा आणि 3 वर्षांच्या दुर्गेश या दोन निरागस मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी मारून आयुष्याची अखेर केली. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास धुळ्यात हा प्रकार उजेडात आल्यानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली. विहिरीतून जेव्हा त्या आई आणि दोन बाळांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
Maharashtra TimesSolapur News: मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरुन… इन्स्टावर पोस्ट केली अन् मग तरुणाने जीव दिला, आई-वडिलांचा टाहो

सुरुवातीला चांगली वागणूक, नंतर छळ सुरू

लग्नानंतर सुरुवातीचं एक वर्ष गायत्रीला सासरी योग्य वागणूक मिळाली. मात्र, त्यानंतर किरकोळ कारणांवरून सतत मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फोन करण्यावरही बंदी, घरकाम व स्वयंपाकावरून भांडण, सासू-सासऱ्यांकडून शिवीगाळ व मारहाण अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. माहेरी ती वेळोवेळी आपल्या वेदना सांगत असे. काही नातेवाईकांनी मध्यस्थी करून समज देत तिला पुन्हा सासरी पाठविले होते.

माहेरी निकुंभे गावात तिघांवर झाले अत्यंसस्कार

निकुंभे शिवारात विहिरीत उडी घेत गायत्रीने मुलासमवेत सामूहिक आत्महत्या केल्यानंतर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता मयतांना बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले होते. शनिवारी 5 वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर गायत्रीच्या सासरी निकुंभे गावात तिच्यासह मुलांवर अत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊ पोलिस होण्याआधीच बहिणीने सोडली साथ

गायत्री आणि गणेश यांच्यात भावा-बहिणीचे अत्यंत घट्ट नाते होते. गणेश हा तीन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. गणेशला पोलिस बनलेले पाहणे, हे तिचे एक मोठे स्वप्न होते. यासाठी गणेश सराव व अभ्यास देखील करीत होता. तर भाऊ पोलिस व्हावा, यासाठी गायत्री देवाकडे नेहमी प्रार्थना करीत होती. परंतु भाऊ पोलिस होण्यापुर्वीच गायत्री जग सोडून गेल्याने कुटूंबियाचे अश्रू अनावर झाले होते.

पती, सासू व सासरे ताब्यात

मृत गायत्रीचा भाऊ गणेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती आनंदा चतुर वाघ (पाटील), सासू वेणूबाई चतुर वाघ (पाटील) आणि सासरे (रा. निकुंभे) यांच्याविरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तुषार देवरे यांच्या नेतृत्वात पुढील तपास पीएसआय संदीप ठाकरे करीत आहेत.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.आणखी वाचा