Headlines

Colombo- Port Of Call: श्रीलंका आवडे सर्वांना – colombo- port of call book explained


Colombo- Port Of Call: या पुस्तकात महात्मा गांधी, सर डोनाल्ड ब्रॅडमन, मार्क ट्वेन, आंतोन चेखोव, जपानचे प्रिन्स हिरोहितो, अमेरिकी नृत्यांगना जेन शर्मन, सर आर्थर कॉनन डॉयल, इजिप्तचे क्रांतिकारी उराबी पाशा इत्यादींच्या अनुभवांचा समावेश आहे.

colombo
कोलंबो(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
-जतिन देसाई

श्रीलंकेचे (पूर्वीचे सिलोन) सौंदर्य जगभरातील पर्यटकांना अनेक वर्षांपासून आकर्षित करत आले आहे. १८६९मध्ये सुएझ कालवा जलवाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर कोलंबोचे महत्त्व वाढले. ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडकडे जाणारी जहाजे कोलंबोला २-३ दिवस थांबत असत. जहाजातील प्रवासी कोलंबो, कँडी, गॉल यांसारखी शहरे पाहून घेत. श्रीलंका स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व लेखकांनी तिथल्या शहरांना भेटी दिली. अशाच १४ प्रतिष्ठित व्यक्तींच्या श्रीलंका भेटीविषयीची माहिती ‘कोलंबो : पोर्ट ऑफ कॉल’ या पुस्तकातून अजय कमलाकरन यांनी दिली आहे.

महात्मा गांधी १९२७मध्ये सिलोन येथे तीन आठवडे मुक्कामास होते. त्यांच्यासोबत कस्तुरबा, सी. राजगोपालाचारी आणि त्यांची मुलगी लक्ष्मी, गांधीजींचे सचिव महादेवभाई देसाई आणि प्यारेलाल होते. ‘विथ गांधी इन सिलोन’ नावाच्या पुस्तकात महादेवभाई यांनी त्या दौऱ्यातील अनेक आठवणी लिहिल्या आहेत. खादी फंडसाठी निधी गोळा करण्याचा गांधींचा प्रयत्न होता. महादेवभाईंनी लिहिले आहे ‘आम्ही जेव्हा कोलंबोहून निघालो तोपर्यंत ८६,००० रुपये गोळा झाले होते. पुढे आम्ही जाफनाला जाणार होतो. एक लाख रुपये एवढी रक्कम गोळा होणार नाही, असे आम्हाला वाटत होते. परंतु त्याहून अधिक रुपये गोळा झाले. रामनाथन महिला कॉलेजमधून १,१११ रुपये गोळा केले. कँडी येथील धर्मराजा कॉलेजचे प्राचार्य पारसी गृहस्थ होते. त्यांनी देखील निधी गोळा केला. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या तमिळ कामगारांना ते भेटले. त्यांची परिस्थिती आणि त्यांचे होणार शोषण पाहून गांधी अस्वस्थ झाले होते, असे उल्लेख पुस्तकात आहेत.

रशियन लेखक आणि नाटककार चेखोव १८९०च्या २२ डिसेंबरला कोलंबो येथे गेले होते. ते सिलोनमध्ये एकूण ५८ तास होते. त्यांनी कोलंबो आणि जुनी राजधानी कँडीला भेट दिली होती. त्यांनी सिलोनचे वर्णन ‘नंदनवन’ असे केले होते. ते वर्णन ऐकून मार्च १९११मध्ये रशियन लेखक, कवी व नोबेल पारितोषिक विजेते इव्हान बुनिनही तिथे गेले होते. चेखोवच्या साहित्याने श्रीलंकेतील अनेक लेखकांना प्रोत्साहित केले आहे.

सन १९३०मध्ये ब्रॅडमन यांची इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली होती. ऑरफोर्ड नावाच्या जहाजातून हा चमू दौऱ्यासाठी रवाना झाला. दोन एप्रिलला जहाज कोलंबो पोहचले. तिथे त्यांच्याकडे १७ तास होते. तिथे त्यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. सुंदर माउंट लेव्हिनिया आणि एका बौद्ध मंदिरात ते गेले. सिलोन इलेव्हनच्या विरोधात सराव सामना होता. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर क्रिकेट खेळण्याचा २१ वर्षांच्या ब्रॅडमन यांचा हा पहिला अनुभव. ब्रॅडमन यांनी ४० धावा केल्या. तो सामना पाहायला आलेला लोकांना पुढच्या काही महिन्यांत ब्रॅडमन जगातला एक सर्वोत्तम फलंदाज होईल, याचा अंदाज नव्हता. इंग्लंडमध्ये त्यांनी ९७४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला परत जाताना जहाज कोलंबो येथे परत थांबले. सिलोन क्रिकेट असोसिएशनने त्यांचा सत्कार केला. १९३४मध्ये पण इंग्लंडला जाताना जहाज कोलंबोला थांबले होते. सिलोनमध्ये ब्रॅडमनला खेळताना अनेकांनी पाहिले, त्यामुळे ते श्रीलंकन क्रिकेटपटूंसाठी आदर्श झाले.

एखाद्या राजाने किंवा नेत्यांनी बंड केल्यास त्याला शिक्षा म्हणून इतर देशात पाठविण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. इजिप्तच्या उराबी पाशा यांना ब्रिटिशांनी श्रीलंकेत पाठविले होते. त्यांनी राजांच्या विरोधात बंड केले होते. १८८२मध्ये ते दोन महिने इजिप्तचे पंतप्रधान होते. त्याने ब्रिटिशांची मदत घेतली. ब्रिटिशांनी अलेक्झांड्रिया शहर उद्ध्वस्त केले. नऊ वर्षांनंतर ब्रिटिशांनी १९११मध्ये पाशा यांना परत त्यांच्या देशात पाठवले. १८१६मध्ये ब्रिटिशांनी कँडीचे राजे विक्रमा राजसिंगे यांना भारताच्या वेल्लोर येथे पाठवले होते. १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी बहादूर शाह जफर यांना बर्मा येथे पाठवले होते. काल्पनिक गुप्तहेर शेरलॉक होम्स निर्माण करणारे लेखक आर्थर कॉनन डॉयल हे श्रीलंकेत दोनदा गेले होते. पहिल्यांदा ते १९२१मध्ये गेले होते. मुंबईतही ते आले होते. मुंबई शहर त्यांना आवडले होते, अशी रोमांचक माहिती या पुस्तकात आहे.
………………………………………………….
कोलंबो : पोर्ट ऑफ कॉल
लेखक : अजय कमलाकरन
प्रकाशक : पेंग्विन बुक्स
पाने : २७३, किंमत : ५९९ रुपये

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा