Headlines

Chandrapur Politics: ठरलं तर मग! काँग्रेसमधील वाद संपुष्टात, 27 नगरसेवक एकत्र; महापालिकेतील सत्ता ‘हाता’त राहणार


काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत संघर्ष अखेर संपुष्टात आलेला आहे. महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले होते. त्यामुळे सत्ता काँग्रेसच्या हातून निसटण्याची वेळ आली होती.

chandrapur news (2)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. गेले अनेक दिवस चर्चेत असलेला काँग्रेस पक्षाचा गट नोंदणीचा वाद अखेर संपुष्टात आला असून काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी अधिकृतरित्या एकत्र येत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी पूर्ण केली. या प्रक्रियेदरम्यान राजेश अडूर यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी अधिकृत नोंद करण्यात आली. या घडामोडीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये आता सर्व काही सुरळीत असून कोणताही वेगळा गट अस्तित्वात नसल्याचा दावा पक्षाने केला आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेत सर्व २७ नगरसेवक हे एकसंघपणे काँग्रेसच्या गटात असून येत्या १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीचाच महापौर होणार, याबाबत पक्षाला पूर्ण विश्वास आहे.

गट नोंदणीच्या वेळी बोलताना काँग्रेस गटनेते राजेश अडूर म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. आज आम्ही सर्वांनी एकत्र येत नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी केली आहे. हा गट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, तसेच राज्याचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसच्या या गटाला मित्र पक्षांचाही पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष काँग्रेससोबत ठामपणे उभे आहेत. तसेच जनविकास पक्षाचे नगरसेवकही काँग्रेसला पाठिंबा देत असल्याने चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच, म्हणजेच महाविकास आघाडीचाच महापौर होणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर महापौर पदासाठी कोणाची निवड होईल, याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. यासाठी काँग्रेसकडून तीन ते चार उमेदवारांचे नामांकन फॉर्म भरून ठेवण्यात आले आहेत. तसेच उपमहापौर पदासाठी दोन फॉर्म सादर करण्यात आले असून, याबाबतचा निर्णयही पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. महापौर पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी उमेदवार दिल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना अडूर म्हणाले की, चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवली गेली असून आघाडीतील सर्व पक्ष काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे कोणताही संभ्रम राहिलेला नाही.

अडूर यांनी सांगितलं की, पक्षातील सर्व वाद आता पूर्णपणे संपले असून सर्व गट एकत्र आले आहेत. पुढील काळात निवडून आलेले सर्व २७ नगरसेवक एकत्र राहून चंद्रपूर शहराच्या विकासासाठी काम करतील. सध्या काँग्रेसमध्ये आनंदी वातावरण असून, स्थैर्य आणि एकजूट याच्या बळावर महापालिकेत सत्ता स्थापण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा