Chandrakant Patil on NEET Paper Leak : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पेपर फुटीची तुलना आंबा चोरीशी केल्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भाजपचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पेपर फुटीची तुलना आंबा चोरीशी केल्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी ‘एक्स’ सोशल मीडियातून पाटलांवर टिकास्त्र सोडलं आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
“एखादा पेपर फुटल्यानंतर.. म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला, तर त्याची शिक्षा फाशी नसते ना? आंबा चोरला, तर समज देणं असतं. आणखी काही चोरलं, त्याची शिक्षा ठरली असते. प्रत्येक गोष्टीला.. फाशी फाशी असं नसतं ना” असा सवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.
काँग्रेसकडून टीका
“चंद्रकांत पाटील, आंबा चोरीला गेला तर दुसरा विकत घेता येतो. पण पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्याचं भविष्य कुठल्या बाजारात मिळतं? आयुष्य संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना नवीन लेकरू कुठल्या बाजारात मिळणार?” असा भावनिक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत विचारला.
‘आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते’ चंद्रकांत पाटलांचं अजब वक्तव्य. २० विद्यार्थ्यांचा मृत्यू यांना आंबा चोरल्यासारखं वाटतो?’ असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत पेजवरुन विचारण्यात आला आहे.
दुसरीकडे, ‘शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी घोटाळा उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झाला नसून, २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना झाला होता. ठाकरे सरकारने हा घोटाळा उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई केली,’ असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी केला. Narendra Modi : थँक्यू फ्रेण्ड्स! मोदींचा नवा ‘अँगल’, Gen Z चं लक्ष वेधलं, सलग दुसऱ्या रात्री इन्स्टा व्हिडिओ, 24 तासात 10 लाख फॉलोअर्स वाढले फडणवीस यांनी टीईटी घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना अंधारे म्हणाल्या, ‘टीईटी परीक्षा प्रक्रियेचे कंत्राट फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१४ ते १९) दिले. ठाकरे सरकारने पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना अटक केली. मात्र, त्यानंतर त्यापैकी काहींना सत्ताधारी पक्षात प्रवेश देण्यात आला.’
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा