Bhiwandi Food Poisoning Incident: शोरमा खाल्ल्यानंतर भिवंडीतील तब्बल ३७ नागरिकांना विषबाधा झाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील रुग्णसंख्याही वाढत असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधेच्या संशयास्पद घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता भिवंडीत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला १४ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा आकडा तब्बल ३७ वर पोहोचला असून रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील एका शोरमा सेंटरमधून शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि मळमळ यांसारखा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
रुग्णसंख्या १४ वरून थेट ३७ वर
उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ११ रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर रात्रीभर आणि शुक्रवारी सकाळीही नवीन रुग्ण उपचारासाठी येत राहिले. सध्या रुग्णालयात ३७ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील दोन रुग्ण बालक आहेत. काही रुग्णांची प्रकृती सुधारत असली तरी नव्याने रुग्ण दाखल होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शोरमा विक्रेत्यावर एफडीएची कारवाई
घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित शोरमा विक्रेत्यावर रात्रीच धडक कारवाई केली. दुकानातील अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विषबाधेचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, विषबाधाग्रस्तांना सलाईन, इंजेक्शन आणि आवश्यक औषधोपचार दिले जात आहेत. बहुतांश रुग्णांना लूज मोशन्स, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास जाणवत होता. काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थितीवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
रुग्णसंख्या वाढण्याची भीती
अनेक नागरिकांनी संबंधित दुकानातील पदार्थ खाल्ल्याची माहिती समोर येत असल्याने विषबाधाग्रस्तांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले असून तपासाला वेग देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा