Headlines

Bharat gogavale appointed new guardian minister of raigad suspense over nashik ends; रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती


Raigad News: रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नक्की कोण होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज भरत गोगावले यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती(फोटोLipi)
मुंबई: राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष झाल्यानंतर अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजप नेते गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे. भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावर रस्सीखेच सुरू होती. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र आता अखेर या स्पर्धेत गोगावले यांनी बाजी मारत पालकमंत्रिपद मिळवलं आहे. तर दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आग्रह डावलत भाजपने नाशिकचं पालकमंत्रिपद आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून मोठा तिढा निर्माण झाला होता. रायगडचं पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आग्रही होते, तर पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर महायुतीतील तीनही प्रमुख पक्ष दावा सांगत होते. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक राहिले आहेत. मात्र नव्या राजकीय समीकरणांमध्ये दोन्ही पक्ष महायुतीच्या माध्यमातून एकत्रित काम करत आहेत. दोन्ही पक्षांचं जिल्ह्यात वर्चस्व असताना पालकमंत्रिपदाची धुरा कोणाकडे द्यायची, यावरून मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. एकीकडे राष्ट्रवादीतून आदिती तटकरे तर दुसरीकडे शिवसेनेकडून भरत गोगावले या पदासाठी उत्सुक होते. भरत गोगावले यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर आमदारांकडून जाहीरपणे तटकरे यांच्यावर निशाणा साधला जात होता.

कसा सुटला रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा?

मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला तो नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमुळे. या निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी तर, शिवसेनेकडून भरत गोगावले यांच्या मुलासाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेने हा मतदारसंघ अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय घेत त्याबदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद गोगावले यांनी आपल्या पदरात पाडून घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा