Neeraj Singhal Bank Fraud: भारतात बँकांची फसवणूक करून परदेशात पळ काढणं नवीन नाही. विजय मल्ल्या, नीरव मोदी मेहुल चोक्सी यासारखे दिग्गज, ज्यांनी कधीकाळी भारतात उद्योग करून नाव कमावलं, आज हजारो कोटींचा घोटाळा कसून परदेशात पसार झाले आहेत. पण आज आपण ज्या घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत त्याच्या तुलनेत नीरव मोदी आणि मल्ल्या यांचे घोटाळे काहीच नाही.

भूषण स्टीलच्या नीरज सिंघल यांचे नाव कदाचित तुम्ही ऐकले नसेल, पण त्यांचं कारस्थान ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. नीरज सिंघलने देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यांपैकी मोठा कारनामा केला आणि 56,000 कोटींची फेरफार केली.
काय आहे भूषण स्टील घोटाळा
56000 कोटींचा बँक घोटाळा
हा देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा मानला जात असून भूषण स्टीलचे एमडी नीरज सिंघलने तीन डझनहून जास्त बँकांमध्ये फेरफार करून 56000 कोटी रुपयांची फसवणूक केली. हा घोटाळा उघडकीस आला असून भूषण स्टील आता दिवाळखोर झाली आहे. टाटा स्टीलने कंपनी टेकओव्हर केली तर दीर्घकाळापासून ईडी आणि सीबीआय या घोटाळ्याचा तपास करून नियमित कारवाई करत आहे. ईडीकडून नीरज सिंघलला अटक केली गेलेली तर काही दिवसांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. तर अलीकडेच मनी लाँड्रिंगप्रकरणी तपासादरम्यान, ईडीने नीरज सिंघलच्या पत्नीशी संबंधित 58.34 कोटींची मालमत्ता जप्त केली.
तीन डझनहून बँकांना लावला चुना
नीरज सिंघलवर अनेक गंभीर आरोप असून त्यापैकी 36 बँकांच्या 56000 कोटींचा फसवणुकीचा एक आहे. व्यवसायाच्या नावाखाली नीरजने हजारो कोटी रुपयांचा अपहार केला, ज्यासाठी त्याने बनावट कंपन्या तयार केल्या आणि अनेक व्यवहार दाखवून निधीचा अपहार केला. नीरजने कंपनी आणि व्यवसायाच्या नावाखाली बँकांकडून कर्ज घेऊन त्याचा वापर वैयक्तिक कामांसाठी केला. कंपनीच्या नावाखाली बँकांकडून कर्ज घेऊन त्या पैशातून स्वतःसाठी मालमत्ता खरेदी केली, शॉपिंग, पार्ट्या आणि महागड्या गाड्यांवर खर्च केला. बँकांकडून कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला, ज्यामुळे एसबीआय आणि PNB सह बँकांना 56 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.
बँक घोटाळा कसा केला
नीरजने JSW स्टील आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडसोबत व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली बँकांकडून कर्ज घेतले, पण पैशांचा वैयक्तिक वापरासाठी वापर केला. भूषण स्टीलचा प्रमुख नीरज सिंघलने कंपनीच्या नावाने अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँकांकडून कर्ज घेतले, ज्यासाठी बनावट कंपन्या तयार केल्या. अनेक नोंदी दाखवून चतुराईने एका कंपनीतून दुसऱ्या बनावट कंपनीत निधी हस्तांतरित केला आणि त्याचा स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी वापर केला. नीरजने PNB आणि अलाहाबाद बँकेकडून 1,700 कोटींचे कर्ज घेतले, ज्याची परतफेड करण्याऐवजी आणखी कर्जे घेतली. 2007 ते 2014 दरम्यान सगळं असंच सुरू राहिलं, पण व्याज किंवा मुद्दलचा एक पैसाही बँकेला मिळाला नाही. अखेरीस बँकांनी कर्जे NPA घोषित केली.
भूषण स्टीलची सुरुवात कशी झाली
नीरज सिंघलचे वडील ब्रिज भूषण सिंघल यांनी 1987 मध्ये भूषण स्टीलचा पाया घातलेला. सुरुवातीला कंपनी दरवाज्याचे हँडल आणि हँगर बनवायची आणि पुढे जाऊन 2003 मध्ये ओडिशामध्ये मोठा स्टील प्लांट उभारला. भूषण स्टीलला देशातील सर्वात मोठ्या स्टिल कंपनी बनवायचे त्यांचे स्वप्न होते. वडिलांकडून जबाबदारी घेऊन नीरजने सूत्रे सांभाळली पण, मुलाने पार्ट्या आणि ऐशोआराम, चैनीमध्ये पैशा पाण्यासारखा खर्च केला.
दिवाळखोरीनंतर टाटांनी घेतला ताबा
बँकांकडून घेतलेले कर्ज आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरल्यामुळे कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढला आणि नीरजच्या वागणुकीमुळे भूषण स्टील दिवाळखोर झाली. 2018 मध्ये टाटा स्टीलने कंपनीचे अधिग्रहण केले पण त्याआधी 2014 मध्ये नीरजला सीबीआयने अटक केली आणि मग, 2018 मध्ये सिरीयस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिसने सिंघलला गंभीर कॉर्पोरेट फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली.

