दुसरीकडे, संघात एका नव्या पोराची एन्ट्री झाली, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वैभवला बॅकअप ओपनर म्हणून संघात स्थान मिळालं. पण, खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा टी२० वर्ल्डकपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनला अवघ्या ३ मॅचेसनंतर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. संजूला डच्चू देऊन भावनेच्या भरात वैभव सूर्यवंशीला संधी दिली खरी, पण हा पत्ता पूर्णपणे फेल ठरला. वैभव पदार्पणाच्या तिन्ही मॅचेसमध्ये फ्लॉप ठरला आणि टीम इंडियालाही लागोपाठ पराभवाचे धक्के बसत आहेत.
या संपूर्ण वादावर आता भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेल आणि अभिषेक नायर यांनी ‘जिओस्टार’च्या एका शोमध्ये रोखठोक भाष्य केलंय.
“नेहमी संजू सॅमसनचाच बळी का?”
संजू सॅमसनला बाहेर करण्याच्या टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर पार्थिव पटेलने जोरदार टीका केली आहे. पार्थिव म्हणाला की, “नेहमी संजू सॅमसनलाच का टार्गेट केलं जातं? गेल्या ११-१२ वर्षांतील संजूच्या करिअरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर कन्सिस्टन्सी हा एकच प्रश्न नेहमी त्याच्या मागे लागला आहे. १२ वर्षांच्या आयपीएल करिअरमध्ये फक्त एकच सीझन असा गेलाय, ज्यात त्याने ५०० पेक्षा जास्त रन्स केलेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही त्याची तीच कथा आहे; तो एकतर खूप भारी खेळतो किंवा पार फ्लॉप होतो. जेव्हा सिलेक्शनची वेळ येते, तेव्हा हाच मुद्दा त्याच्या आडवा येतो.”
पार्थिवने उडवला धुरळा
पार्थिवने संघ निवडीच्या पद्धतीवरच थेट बोट ठेवलंय. त्याच्या मते, तुम्ही भावना आणि लॉजिक या दोन्ही गोष्टींची खिचडी करून निर्णय घेऊ शकत नाही. पार्थिवने स्पष्ट सांगितलं की, “भावनेच्या भरात तरुण वैभव सूर्यवंशीला संधी देणं एकवेळ योग्य वाटू शकतं. पण जर लॉजिकने विचार केला, तर संजू सॅमसनला बाहेर बसवण्याचं कारण काय? त्यामुळे संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय निव्वळ भावनेच्या भरात घेतलेला दिसतोय.”
“वैभवकडे गमावण्यासारखं काहीच नाही”
तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी लागोपाठ फेल होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना अभिषेक नायरने मात्र एक वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला. नायरच्या मते, जगातील टॉप बॉलर्ससमोर खेळताना वैभवसारख्या नवख्या पोरावर कोणताही प्रेशर नसतो.
‘तू मला लाईक करतोस’ म्हणत चाहतीने श्रेयसला अडवलं; मागे उभ्या वैभवने जे केलं त्याचीच चर्चा
अभिषेक नायर म्हणाला, “समोर जसप्रीत बुमराह किंवा जोफ्रा आर्चरसारखे दिग्गज बॉलर्स असले, तरी खरा प्रेशर हा त्या बॉलर्सवरच असतो, नवख्या खेळाडूवर नाही. कारण वैभवसारख्या युवा खेळाडूकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. जर वैभव बुमराहच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला, तर कोणीही त्याला दोष देणार नाही. पण बुमराहसारख्या बॉलरला नक्कीच भीती असते, कारण समोर असा पोरगा आहे जो पहिल्याच बॉलवर सिक्स मारताना मागेपुढे पाहत नाही.”
मोठ्या नावांना असते प्रतिष्ठेची भीती!
नायरने पुढे सांगितलं की, इंटरनॅशनल लेव्हलवर नाव कमावलेल्या बॉलर्सना आपल्या इभ्रतीची जास्त काळजी असते. जर एखादा नवखा मुलगा बुमराहला सिक्स मारतो, तर त्या मुलाचा भाव वधारतो आणि बॉलरची पत घसरते. उलट जर बॉलरने त्याला आऊट केलं, तर लोक म्हणतात की ‘तो तर अजून लहान मुलगा आहे, त्यात काय मोठं!’
त्यामुळेच सुरुवातीला एक तरुण खेळाडू पूर्ण बिनधास्तपणे आणि मोकळेपणाने खेळतो. पण तो जितका जास्त खेळत जाईल आणि नाव कमवेल, तितक्या लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. आणि एकदा अपेक्षांचं ओझं डोक्यावर आलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर तोच परफॉर्मन्स टिकवून ठेवणं भल्याभल्यांना कठीण जातं, असं नायरने स्पष्ट केलं.

