ब्रुक, सॉल्ट यांची नाबाद अर्धशतके, अय्यरचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था, ब्रिस्टॉल
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान इंग्लंडने भारतावर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील झालेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. हॅरी ब्रुक आणि फिल सॉल्ट यांनी नाबाद अर्धशतके झळकविली तर भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरचे नाबाद अर्धशतक वाया गेले. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवारी साऊदम्पटन येथे खेळविला जाईल.
या चौथ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत भारताने 7 बाद 158 धावा जमविल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 49 चेंडूत 4 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 80 धावा झळकविल्या. मात्र इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट्स निष्काळजीपणे फेकल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 13.5 षटकांत 1 बाद 159 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी आरामात जिंकला.
इंग्लंडच्या डावामध्ये हॅरी ब्रुकने 35 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 79 तर फिल सॉल्टने 42 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 59 धावा झळकविल्या. भारतीय संघाला गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत पाठोपाठ मालिका गमवाव्या लागल्या आहेत. 2018-19 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने टी-20 प्रकारात पाठोपाठ मालिका गमविल्या आहेत.
भारताने अलिकडच्या कालावधीत आयर्लंडकडून 2-0 असा पराभव स्वीकाराला होता. तर इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत भारतीय संघ 0-3 असा पिछाडीवर आहे. सूर्यकुमार यादवला डच्चू दिल्यानंतर श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. पण त्याला गेल्या सहा पैकी 5 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. गुरुवारच्या चौथ्या सामन्यात हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती यांना दुखापतीमुळे खेळता आले नाही. प्रसिद्ध कृष्णाकडे नवा चेंडू सोपविण्यात आला होता. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकांत बटलरला बाद केले. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांना शेवटपर्यंत निष्प्रभ ठरले. प्रिन्स यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांची गोलंदाजी इंग्लंडच्या ब्रुक आणि सॉल्ट यांनी झोडपून काढली. डावातीला 8 आणि 9 व्या षटकांत इंग्लंडने वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर 37 धावा झोडपल्या. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचा हा टी-20 प्रकारातील 100 वा सामना होता. ब्रुकने 21 चेंडूत अर्धशतक झळकविले.
तत्पूर्वी भारताच्या डावात अय्यर आणि शिवम दुबे यांनी 53 धावांची भागिदारी केली. दुबेने 22 धावा जमविल्या. अय्यरने आदिल रशीदच्या एका षटकांत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 20 धावा झोडपल्या. इंग्लंडच्या आर्चरने 20 धावांत 2 गडी बाद केले. तसेच त्याने अक्षर पटेलला धावचीत केले. आर्चरने वैभव सूर्यवंशीला 15 धावांवर झेलबाद केले. आर्चरने या मालिकेत दुसऱ्यांदा सूर्यवंशीचा बळी मिळविला. इंग्लंडच्या टंगने 36 धावांत 2 गडी बाद केले. त्याने इशान किशनला 4 धावांवर बाद केले. आदिल रशीदने आपल्या पहिल्याच षटकांत अभिषेक शर्माला 16 धावांवर बाद केले. भारताची स्थिती यावेळी 7 षटकांत 3 बाद 48 अशी होती. दुबेने 23 चेंडूत 22 धावा जमविल्या. तिलक वर्मा केवळ 1 धावेवर बाद झाला. या मालिकेत 15 वर्षीय वैभवला तीन सामन्यांत 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्याने अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा जमविल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 7 बाद 158 (श्रेयस अय्यर नाबाद 80, शिवम दुबे 22, वैभव सूर्यवंशी 15, अभिषेक शर्मा 16, इशान किशन 4, आर्चर, टंग, प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड 13.5 षटकांत 1 बाद 159 (हॅरी ब्रुक नाबाद 79, सॉल्ट नाबाद 59).
