Headlines

सगुण-निर्गुण: किमया नामस्मरणाची… – anirudh shandilya sagun nirgun article on chanting importance


जितक्या प्रेमानं आणि भक्तीनं मी हरीचं नामस्मरण करीन, तितका तो त्या मूर्तीत मला दिसायला लागला.

सगुण निर्गुण लेख
नामस्मरणाची किमया(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
-अनिरुद्ध शांडिल्य

वाचता वाचता अचानकपणे वामन पंडिताचा एक श्लोक समोर आला. ‘हरिपण हरिनामे धातुमूर्तीस आले। हरिमय हरिनामे विश्वसंतांसि जाले।। भवभय हरिनामे साधकांचे पळाले। वाद वाद वाद जिव्हे, रामनामे रसाळे ।।’ श्लोक वाचला आणि जे वाचत होतो, ते बंद करून ठेवलं. मनात हाच श्लोक येत राह्यला. हळूहळू त्या श्लोकाचा मथितार्थ मनात झिरपायला लागला. वाटलं, वामन पंडितांनी किती मोठी गोष्ट किती सोप्प्या शब्दांत सहजपणं सांगितली आहे. मुळात ही एक धातूची मूर्ती आहे.

तिच्याकडं मी पाहिलं आणि मनाला वाटलं, अरे! हा तर हरीच आहे. त्याचंच सगुण रूप या मूर्तीतून साकार झालं आहे. ते माझ्या मनाला असीम आनंद देत आहे. त्या आनंदाला चटावलेलं मन मग सतत हरीचाच जप करू लागलं. जसजसं मी ते नाव घ्यायला लागलो, तसतसा त्या मूर्तीत मला हरी दिसायला लागला. त्याचं रूप डोळ्यांसमोर दिसायला लागलं.

बघता बघता त्या मूर्तीत मला हरीची विविध रूपं दिसायला लागली. नजर जाईल तिकडं हरीच आहे, असा भास व्हायला लागला. आणि मग मनातलं सारं भय कुठच्या कुठं पळालं. वाढत्या वयासोबत येणारे आजार, सांधे आणि स्नायूदुखी, मंदावलेली चाल, जिना चढताना घ्यावा लागणारा आधार… वाढतं वय असं सारखं चहूबाजूंनी येऊन भिडत असताना मनात भयही दाटून येत होतं. पण तोंडात हरीचं नाव आलं. त्यानं बरं वाटलं. त्या बरं वाटण्याच्या ओढीनं हरी, हरी, हरी… आणि मग सारं भय दूरवर गेलं. माझ्यापासून ते लांब गेलं. ही किमया या हरीच्या नावाची. त्या निर्गुण निराकार शक्तीच्या उपासनेचा हा किती सोपा मार्ग वामन पंडितांनी या श्लोकात सांगितला आहे.

मनात आलं, समजा मी हरीऐवजी राम किंवा शंकर किंवा दत्त… कुठलंही नाव घेत राह्यलो असतो, तर परंपरेनं त्या नावाला दिलेलं रूप मला दिसत राह्यलं असतं. सततच्या नामस्मरणानं ती जादू केली असती. मग त्याच रूपाचं गारुड मनावर पडलं असतं. त्यातच मन हवा असलेला आधार शोधत राह्यलं असतं. सततच्या नामस्मरणानं तो दिलाच असता!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांनी विज्ञान व साहित्यविषयक विपुल लिखाण केले आहे.)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा