Headlines

पूर्व विदर्भाला झोडपले! गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पूर; भंडारा जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर – maharashtra weather update flood in eastern vidarbha holiday declared in bhandara districts schools


Vidarbha Rain Alert: गोंदिया जिल्ह्यात माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. आज, शुक्रवारी दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे.

vidarbha rain news1
vidarbha rain news1(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, भंडारा: पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. नाल्याच्या पुरातून वाट काढण्याच्या प्रयत्नात ग्रामसेवक कारसह वाहून गेला होता. आलापल्लीतील काही घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. विरुर नाल्याच्या पुरात अडकलेल्या दोन बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यात माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. आज, शुक्रवारी दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुरातून वाट काढण्याच्या प्रयत्नात ग्रामसेवक चारचाकी वाहनासह वाहून गेला. प्रशासनाने त्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. प्राणहिता, गोदावरी नद्यांना पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने नदी काठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Timesसर्वसामान्यांना स्वस्त घरांची लॉटरी! राज्याचे गृहनिर्माण धोरण जाहीर; २०३०पर्यंत मिळणार पर्यावरणपूरक घरे
दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दक्षिण गडचिरोलीत पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. सती नदीजवळ कडोली गावाजवळ पूर आल्याने कुरखेडा-वैरागड, कुंबी-माडेमूल आणि तळेगाव-पळसगाव-चारभट्टी हा प्रस्तावित जिल्हा मार्गही नाल्याला पूर आल्यामुळे बंद पडला होता. मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे (४५) हे रात्री चारचाकी वाहनातून नाला ओलांडत असताना अचानक आलेल्या पुराने वाहनासह वाहून गेले. मात्र स्थानिक तरुण आणि जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने रेस्क्यू मोहीम राबवून झाडाला लटकलेल्या ग्रामसेवक धोडरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. चार तालुक्यांचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या आलापल्ली येथील काही घरांत पाणी शिरले असून प्रशासनाने तब्बल ६४ नागरिकांना रेस्क्यू करून जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’
चंद्रपूर
: मागील दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात जनजीवन विस्कळीत झाले. विरुर नाल्याला पूर आल्याने एसटीच्या दोन बसेस चिचबोर्डी आणि सिर्शी गावाजवळ अडकल्या होत्या. पोलिसांनी बचाव मोहिम राबवित ६० शालेय विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या गावी सुखरुप पोहचविले. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट दिला आहे. पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे.
Maharashtra Timesबुलढाण्यात अतिक्रमणधारकांचा पोलिसांवर हल्ला; गाड्यांवर दगडं फेकली, 13 कर्मचारी जखमी
मेळघाटात दरड कोसळली
अमरावती :
मेळघाटसह तिवसा आणि मोर्शी तालुक्याला गुरुवारी पावसाने दणका दिला. मोर्शी, शिरखेड, नेरपिंगळाई परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मेळघाटातील धारणी-हरिसाल, अकोट आणि बेलकुंड मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक प्रभावित झाली होती.

पूरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
गोंदिया :
सालेकसा तालुक्यातील दरेकसा येथील माजी जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा कोपालगडदरम्यान वाहणाऱ्या नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. टिकेश शंकरलाल मडावी (४५) असे मृताचे नाव आहे. टिकेश हे सायंकाळी कोपालगड येथील मित्राकडे जेवण करायला गले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतर दुचाकीने घराकडे परत निघाले. नाल्याच्या पुरातून वाट काढण्याचा प्रयत्न केला असता ते वाहून गेले. रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला
Maharashtra Timesगणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून कोकणसाठी धावणार १२ स्पेशल ट्रेन्स, असे आहे नियोजन
अतिवृष्टीचा इशारा
आजपासून दोन दिवस बरसणार दमदार पाऊस
प्रादेशिक हवामान खात्याने आज शुक्रवार, २५ आणि शनिवार, २६ जुलै रोजी विदर्भात सर्वत्र अतिवृष्टीचा तर काही ठिकाणी तीव्र अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीला ‘रेड अलर्ट’, नागपूर व वर्धा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा