मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मान्सून आणखी सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला असून विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पवई आदी परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले आहे.
राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
दरम्यान, आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची तर काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आजही राज्यातील बहुतांश भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना आज, मंगळवारी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र ऑरेंज देण्यात आला आहे. तर तिकडे विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मान्सून दाखल होणार आहे. याच जिल्ह्यांना मान्सूनचा यलो अलर्ट वर्तवला आहे. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मान्सूनचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला.
दरम्यान, पावसाच्या अनियमिततेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला असतानाही जूनच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नागपूर जिल्ह्यातील कुही, भिवापूर आणि उमरेड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस व सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने अनेक ठिकाणी पिके उगवली नाहीत आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. अतिरिक्त बियाणे, मजुरी आणि मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
नागपूर शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मध्यम ते जोरदार पावसाने महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचीही पोलखोल केली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले, तर सिव्हिल लाईन्स परिसरातील महापालिका मुख्यालयाच्या आवारातही बराच वेळ पाणी तुंबले होते. त्यामुळे मान्सूनपूर्व स्वच्छता आणि नालेसफाईच्या कामांवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
