Headlines

Raghuvir Khedkar Warn to Maharashtra Government Will Return Padma Shri Award


प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी भर कार्यक्रमात नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. रघुवीर खेडकर यांनी सरकारला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.

Raghuvir Khedkar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : ज्येष्ठ लोककलाकार तथा तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि समरता साहित्य परिषद यांच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे लोककला संमेलन पार पडलं. हा कार्यक्रम रविवारी 28 जून रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे दोन्ही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे रघुवीर खेडकर यांनी खेद व्यक्त करत सरकारला इशारा दिला.

“मला आज खेद एकाच गोष्टीचा वाटतो, ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं ते इथे उपस्थित नाहीत. खरंतर मला यावर बोलायचंच आहे. पुन्हा मला नाही बोलावलं तरी चालेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार कार्यक्रमाल का आले नाहीत? त्यांना असं कोणतं काम मिळालं?”, असे प्रश्न रघुवीर खेडकर यांनी उपस्थित केले.

रघुवीर खेडकर यांच्याकडून नाराजी व्यक्त

“ते महाराष्ट्राचे सर्वोसर्वा आहेत. एखादं काम बाजूला ठेवलं असतं तर चाललं नसतं का? पण लोककलावंत, वेशीबाहेरचा कलावंत, काय जायचं त्यांच्या कार्यक्रमाला? काय त्यांचा सन्मान करायचा? हे या मोठ्या लोकांच्या डोक्यात असतं. अजूनही ते आपल्याला गावकुसाबाहेरचाच समजतात. त्याचं आजचं प्रतिक आहे की, ते आज इथे हजर नाहीत”, अशी नाराजी रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली.

‘निदान आशिष शेलार यांनी तरी यायला हवं होतं’

“त्यांनी उद्या माझ्यावर पोलीस कारवाई करावी, तरी चालेल. मला पद्मश्री पुरस्कार सोडावा लागला तरी चालेल. पण हे चुकीचं आहे. निदान आशिष शेलार यांनी तरी यायला हवं होतं. कारण ते सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांना कामे कायम राहणार. त्यांना दिवस-रात्र काम राहणार, मग आमच्यासाठी वेळ केव्हा देणार? त्यांनी एका महिन्याच्या आत दुसरं संमेलन ठेवलं पाहिजे. त्यांनी संमेलन नाही ठेवलं तर मी पद्मश्री सोडून देईन”, असा इशारा त्यांनी दिला.

‘लोककलावंतांच्याच वेळेला तुमच्याकडे वेळ नाही?’

“का? आम्ही कलावंत नाहीत? आम्ही माणसं नाहीत? आमच्याकडे कला नाही? सिनेमाच्या संमेलनाला तुम्ही ताबोडतोब जाता, तुमच्याकडे वेळ असतो. नाटकाच्या संमेलनाला तुम्ही ताबोडतोब जाता, तेव्हा तुम्हाला टाईम असतो. पण लोककलावंतांच्या वेळेला तुमच्याकडे टाईम नाही? मुख्यमंत्री आणि सासंस्कृतीक मंत्री कार्यक्रमाला आले नाहीत याचा मला कायम खेद राहील. जोपर्यंत दुसरं संमेलन ते भरवत नाहीत तोपर्यंत मला चैन पडणार नाही”, असं रघुवीर खेडकर म्हणाले.

‘…तर पद्मश्री परत करेन’

“आज विठाबाईचं स्मारक का होत नाही? 15 वर्षे झाले मी विठाबाईच्या स्मारकासाठी झटतोय. का होत नाही? तमासगीर आहे म्हणून होत नाही. तमाशा कलावंतांना वेळेवर मानधन मिळत नाही. कारण ते ओरडणारे नाहीत. गोरगरीब आहेत. तमाशा फडांवर हल्ले होतात. मी आजच इशारा देतोय, हेच संमेलन, याच पुण्यात मोठ्या सभागृहात ठेवलं नाही तर मी पद्मश्री परत करेन”, असा इशारा रघुवीर खेडकर यांनी दिला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा