Melghat Water Crisis: अनेक गावात नळ असूनही गढूळ पाण्यामुळे पिण्याकरिता महिलांना गावाशेजारच्या विहिरीवरून पाणी आणावे लागते.

जलजीवन मिशन अंतर्गत मेळघाटातील अनेक गावांमध्ये घराघरांत नळजोडण्या दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, या नळांमधून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक गावांमध्ये तलावातील विहिरींवर आधारित पाणीपुरवठा योजना राबवली गेली आहे. पावसाळ्यात किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळे हे तलावातील पाणी कमालीचे गढूळ होते. प्रशासन जरी या पाण्याचे ‘क्लोरिनेशन’ करत असल्याचा दावा करत असले, तरी आरोग्याच्या भीतीपोटी ग्रामस्थ हे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे टाळत आहेत. हे पाणी केवळ घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून, पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेर असलेल्या पारंपरिक विहिरींवरच गावकऱ्यांची भिस्त आहे. अशा विहिरी आदिवासींसाठी जीवनवाहिनी असल्या, तरी त्यांची साठवण क्षमता संपूर्ण गावाची तहान भागवण्याइतकी नाही. त्यामुळे प्रशासनाचा शुद्ध पाणीपुरवठ्याचा फुगा फुटला आहे.
Maharashtra Heatwave: सूर्य कोपला! उष्णतेच्या लाटांचा राज्याला तडाखा, तब्बल 183 तालुक्यांत पारा 45 अंशांपार
पिण्याच्या पाण्याचा विसर
मेळघाटात सध्या जलसंधारणाच्या माध्यमातून पर्यटन आणि सुशोभीकरणाचे मोठे मनसुबे रचले जात आहेत. मात्र, हे करत असताना तिथल्या मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. एका बाजूला पर्यटन विकासाची चकचकीत स्वप्ने आणि दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण, अशी टोकाची विसंगती चिखलदरा आणि धारणी तालुक्यात पाहायला मिळत आहे.
Adhik Maas : 7000 लीटर आमरस, 1 टन पुरण अन् 500 जावयांचा थाट; अधिकमास निमित्त भव्य ‘धोंड्याच्या जेवणाचा’ सोहळा
‘प्रगतिपथावर’च्या चक्रात कामे
‘ जलयुक्त शिवार अभियान २.० ’ अंतर्गत तब्बल ६१८ कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी ८ कोटी १२ लाखांचा निधीही वितरित करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून जलसंधारण करण्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु, चिखलदरा तालुक्यातील मडकी आणि कोहाणासारख्या अनेक गावांत सिमेंट नाला बांधकामे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची स्थिती पाहता, हे प्रकल्प केवळ ‘मंजूर’ आणि ‘प्रगतिपथावर’ या सरकारी चक्रातच अडकल्याचे दिसते.
मंजूर कामे व निधी
भूजल सर्वेक्षण यंत्रणा- ६०३ कामे (५.१५ कोटी)
मृद व जलसंधारण (जि.प.)- ११ कामे (१.६९ कोटी)
मध्यम व लघु पाटबंधारे- ४ कामे (१.२८ कोटी)
एकूण- ६१८ कामे (८.१२ कोटी)

