IND vs SL Test Turnig Point : भारत आणि श्रीलंका दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारताच्या हातात हा सामना होता, मात्र श्रीलंका संघाचा एकटा खेळाडू खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याने गेम फिरवला, कोण आहे तो खेळाडू ? जाणून घ्या.

काही वर्षांपासून तळाचे फलंदाज भारतास सतावत आहेत. हेच या कसोटीतही घडले.सोनल दिनुशाने या मालिकेतील चारपैकी तीन डावांत शतक केले, त्याचे ‘स्वीप’ ही भारतास रोखता आले नाही. त्याने आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेला फटका भारतास दीर्घकाळ भोवणार आहे. भारताची या कसोटीतही मदार फिरकी गोलंदाजांवर होती; मात्र दिनुशाने त्यांच्याविरुद्ध ‘स्वीप’चा सहज वापर केला. दिनुशाने त्याच्या मर्यादा जाणून फलंदाजी केली; मात्र त्याला चुकीचा फटका खेळण्याच्या मोहात पाडण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले.
Sonal Dinusha IND vs SL : टीम इंडियाला विजयापासून रोखलं, पण सामन्यानंतरच्या वक्तव्याने भारतीयांचं मन जिंकलं! दिनुशा नेमकं काय म्हणाला?
भारतीयांनीविकेटसाठी प्रयत्न केले; पण त्यात सातत्य नव्हते. उपाहारापूर्वी भारतीयांना एकही विकेट मिळाली नाही. मानव सुतारच्या फिरकी घेतलेल्या, तसेच अचानक उसळलेल्या चेंडूवर नुवांता चकला. तीन विकेट शिल्लक असताना श्रीलंकेची आघाडी अवधी ११७धावांची होती; मात्र श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी झुंज कायम ठेवली. पहिल्या डावात फॉलोऑन श्रीलंका टाळणार असे वाटत असतानाच कुमारा बाद झाला होता; मात्र त्याने ही चूक दुसऱ्या डावात टाळली. त्याने केवळ १२ धावा केल्या; पण तो दोन तास खेळपट्टीवर होता. ‘बूट मार्क’ मुळे जाडेजाचा चेंडू भेदक झाला, त्यावरच कुमारा चुकला; मात्र तोपर्यंत श्रीलंकेने पराभव टाळला होता. त्यानंतर भारतीयांनी बदली गोलंदाजांकडे चेंडू सोपवून विजयाची संधी दुरावली असल्याचे स्वीकारले.
Devdutt Padikkal : नंबर-3 असो वा कुठलीही जागा, देशासाठी खेळणं महत्त्वाचं; देवदत्त पडिक्कल मालिकावीर पुरस्कारानंतर बोलताना काय म्हणाला?
सुतार, जाडेजा आणि सारांश जैन यांनी दुसऱ्या डावात किमान ३५ षटके मारा केला. त्यांचे चेंडू क्वचितच वळले. त्यात भेदकतेचाही अभाव होता. काही चेंडूंनीच फलंदाजांची परीक्षा पाहिली. या दरम्यानचे चेंडू फलंदाजांच्या अपेक्षेनुसारच होते. वेगवान गोलंदाजांशी खेळपट्टी फटकून वागली. सिराजने त्याही परिस्थितीत दिनुशावर आखूड टप्प्याचे चेंडू टाकले. त्यावर दिनुशा पूर्ण नियंत्रण राखू शकला नाही; मात्र तो डगमगला नाही.
श्रीलंकेचा सुपरमॅन
श्रीलंकेसाठी जणू सुपरमॅन झालेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने ४२० मिनिटांत २६४ चेंडू खेळून काढले. या मालिकेतील दोन कसोर्टीत त्याने ११३९ मिनिटे फलंदाजी केली; तसेच ७२२ चेंडू खेळले. त्याच्या या खेळीमुळे श्रीलंकेला त्यांचा दुसरा डाव घोषित करता आला, पाचव्या दिवशी सकाळी ताठ मानेने मैदानात प्रवेश केलेला भारतीय संघ संध्याकाळी निराश होता.
भारताचा मार्ग अवघड
श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेत २-० असे धवल यश मिळवून जागतिक कसोटी क्रमवारीत बांगलादेशला मागे टाकण्याची भारतास संधी होती; मात्र मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतास बाराऐवजी चार गुणांवरच समाधान मानावे लागले. या गमावलेल्या आठ गुणांमुळे भारताचा जागतिक कसोटी विजेतेपद लढतींसाठी पात्र ठरण्याचा मार्ग खूपच खडतर झाला आहे. पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकलेल्या भारतास दुसऱ्या कसोटीतही विजयाची संधी होती. विजयाने गुण दुरावल्याने भारत जागतिक कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम राहिला.

