अवघ्या भूतमात्रांबद्दलचं प्रेम येतं. आपपर भाव लोप पावतो. साऱ्या चराचरात जे चैतन्य आहे, जी शक्ती आहे, तीच माझ्यातही आहे याची जाणीव त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून दिसत राहते.

सर्वसाधारण अनुभव असा आहे की, प्रवचन करताना मोठाल्या गोष्टी करणारे, तत्त्वाच्या कथा सांगणारे, मोहमायापाश विषवत असल्याचं प्रतिपादन करणारे, सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान असं बोलणारे प्रत्यक्ष आयुष्यात याच्या विपरीत वागत असतात. त्यांना प्रसिद्धी, पैसा यांची हाव असते. कनक-कांता यांची ओढ असते. योगाकडं नाही, तर भोगाकडं त्यांचं मन झेपावत असतं. जुनी उपमा द्यावयाची, तर नाटकामध्ये धैर्यधराचं काम करणारा प्रत्यक्षात घाबरट असावा किंवा लक्ष्मीधराची भूमिका वठवणारा वास्तवात गरिबीनं गांजलेला असावा, तशी यांची गत असते. समोरचा भुलेल असं बोलण्यात ते वाकबगार असतात. चेहऱ्यावरील भावदर्शनात निष्णात असतात. थोडक्यात, ते उत्तम अभिनेते असतात. या आकर्षक; पण फसव्या मुखवट्यामागचं त्यांचं रूप भलतंच असतं. अनेकदा तर ते आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असू शकतं. याचं एक कारण भक्ती करण्यामागं, देवाचं नामस्मरण करण्यामागं, प्रवचन करण्यामागं त्यांचा हेतू हा निखळ भक्तीचा नसतो. उद्देश हा देवाच्या चरणी लीन होण्याचा नसतो. त्याच्या चिंतनातच आनंद मानण्याचा नसतो. त्याच्या ध्यानातच सुख आहे, अशी त्यांची धारणा नसते.
म्हणजेच ती भक्ती खरी नसते, तर आपला मनातला हेतू साध्य करण्यासाठी उभा केलेला तो देखावा असतो. आणि जसा उद्देश तसा परिणाम हे वारंवार सिद्ध झालं आहे. त्यामुळेच ‘अशा’ भक्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या विरक्तीची कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. उलट कनक, कांता, कीर्ती याबद्दल विलक्षण आसक्ती त्यांच्या मनात असते. ती त्याच्या देहबोलीतून अनेकदा व्यक्त होते. त्याच्या कार्यक्रमांच्या स्वरूपावरून स्पष्ट होते. हे खऱ्या भक्ताच्या बाबतीत कधीही दिसत नाही. खऱ्या भक्तामध्ये ‘गोवत्स न्याया’प्रमाणं भक्तीच्या मागोमाग विरक्ती येतेच. विशाल दृष्टी येते. अवघ्या भूतमात्रांबद्दलचं प्रेम येतं. आपपर भाव लोप पावतो. साऱ्या चराचरात जे चैतन्य आहे, जी शक्ती आहे, तीच माझ्यातही आहे याची जाणीव त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून दिसत राहते. तुकाराम महाराज सांगतात, ‘भक्त ऐसे जाणा जे देही उदास। गेले आशापाश निवारूनि।। विषय तो त्यांचा जाला नारायणा। नावडे जन धन माता पिता।। निर्वाणी गोविंद असे मागें पुढें। कांहींच साकडें पडों नेदी।। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य। घातलिया भय नर्का जाणें।।’

