Amravati Samruddhi Expressway Accident : अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रकच्या मागे वॅगनआर कार आदळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना नेमकी कशी घडली?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताने पाच जणांचा बळी घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरहून मुंबईकडे निघालेली वॅगनआर कार भरधाव ट्रकच्या मागे आदळल्याने हा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघात धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक १०५ जवळ घडल्याचे सांगण्यात आले.
कार चक्काचूर, सावरण्याची संधी नाही
दरम्यान अपघाताच्या उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, वॅगनआर कार चंद्रपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. याचवेळी पुढे धावणाऱ्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
एका कुटुंबावर घाला
या दुर्घटनेत मृत्यू झालेले पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. दुर्दैवाने या अपघातात एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यानंतर सर्व मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. पण प्रथमदर्शनी हा अपघात वेगावरील नियंत्रण गमावल्याने झाला असल्याचे दिसत आहे. पण नेमके कारण पोलीस तपासानंतरच समोर येईल.
वाहतूक विस्कळीत
दरम्यान, अपघातानंतर समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूक संथ झाली होती. मार्गावरील अपघातग्रस्त कार आणि ट्रकमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा