Headlines

आंबोलीत वाहतूक नियम तोडणाऱ्या २४३ वाहनांवर कारवाई


सावंतवाडी शहर वार्ताहर : आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार या दोन दिवसांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली. ८ आणि ९ ऑगस्ट या दोन दिवसांत तब्बल २४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आंबोली घाटातील तसेच पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यास पोलिसांना यश आले.

शनिवार, ८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ७० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तर रविवार, ९ ऑगस्ट रोजी तब्बल १७३ वाहनचालकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

दोन दिवस राबविण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ११८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच वाहन चालविण्याचा परवाना सोबत नसलेल्या २३, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १७, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ६, टिंटेड ग्लास असलेल्या १४, सीट बेल्ट न लावलेल्या १ आणि हेल्मेट न वापरणाऱ्या ४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मोबाईलवर संभाषण करणाऱ्या ५ वाहनचालकांचाही यात समावेश आहे.

याशिवाय सीट बेल्ट न लावणे, वाहनांचे आरसे नसणे अथवा तुटलेले असणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहून नेणे, वाहनाचा विमा नसणे, चुकीच्या पद्धतीने इशारा देणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली. पर्यटन हंगामात आंबोलीत वाढणारी पर्यटकांची गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक लक्षात घेता, आगामी काळातही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत