कुडाळ / प्रतिनिधी : येथील राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.अशी माहिती यात्रेचे संयोजक व राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे विवेक पंडीत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येथील MIDC विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री पंडित म्हणाले, तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना वाढावी आणि जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने मंचच्या माध्यमातून दरमहा इतिहास व्याख्यानाचे आयोजन केले जाते. इतिहास अभ्यासक व संशोधक रवीराज पराडकर यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. अजूनही ती चालू आहेत. शासनाने तिरंगा रॅली काढण्या बाबत आदेश काढले आहेत
शासकीय स्तरावर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, त्याच धर्तीवर सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून देशप्रेमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंध नसल्याचे विवेक पंडीत यांनी स्पष्ट केले.
जात, धर्म आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन देशप्रेमी नागरिकांनी एकत्र यावे, हा यात्रेचा मुख्य संदेश आहे. यात्रेदरम्यान देशप्रेमाचा संदेश देणारी गीते वाजविण्यात येणार आहेत. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता भैरव मंदिर येथून तिरंगा यात्रेला सुरुवात होऊन एस.एन.देसाई चौक पर्यंत यात्रा नेण्यात येणार आहे. या यात्रेत जास्तीत जास्त देशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बंड्या सावंत म्हणाले, राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या बॅनरखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. हि यात्रा पक्षविरहीत आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या अभियानांतर्गत १३, १४ व १५ ऑगस्ट या कालावधीत वीर माता, वीर पत्नी, माजी सैनिक यांचा घरोघरी जाऊन सत्कार करून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. यावेळी संध्या तेरसे, रमाकांत नाईक, सुनील बांदेकर, शिवम म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.
