अध्यात्माच्या क्षेत्रातले आपण अधिकारी आहोत, अशी भावना त्याच्या मनात मूळ धरू लागते. पंडिताच्या थाटात तो बोलायला लागतो. एखाद्यानं शंका विचारली तर तो शंकेखोराशी वाद घालतो.

नामस्मरण ाचा उद्देश भगवंताचं रूप समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्या आदिशक्तीला समजून घेता घेता अगोदर आत्मभान आणि नंतर आत्मज्ञान होणं, असा असायला हवा. हे साध्य करायचं, तर नामस्मरण प्रामाणिकपणं करायला हवं. दान दिलं तर एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये, इतक्या निर्लेप वृत्तीनं, निरपेक्ष विचारानं, अलिप्त मनानं ते द्यायला हवं. तसंच नामस्मरणाचं किंवा ईशभक्तीचंही आहे.
स्वच्छ मनानं आणि निरपेक्ष वृत्तीनं ती करायला हवी. मी ईश्वराची भक्ती करतो आहे, नामस्मरण करतो आहे, काल मी इतक्यावेळा जप केला. आज इतका जप करणार… असं सांगायचं नसतं. आपण करत असलेल्या भक्तीचा आपणच गवगवा केला तर आपल्या नकळत आपल्यातला ‘अहं’ जागा होऊ लागतो. दुसरं असं की ज्यांना असा जप करता येत नाही किंवा नेमानं नामस्मरण करता येत नाही, अशी माणसं अगोदर कुतूहलानं त्या भक्तीचा गजर करणाऱ्या ‘जपकरा’च्या भोवती जमा व्हायला लागतात. हळूहळू त्यांना वाटू लागतं की आपण आणि देव यांच्यामधला दुवा म्हणजेच हा ‘जपकर’ आहे. त्यांची अशी धारणा होऊ लगते, कारण त्यांच्या ते सोयीचं असतं. त्या ‘जपकरा’कडं मग नामस्मरणाचाच सोहळा सुरू होतो. त्यामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वाढायला लागते.
ही वाढती गर्दी पाहून ‘जपकर’ सुखावतो. त्याचं वागणं, बोलणं बदलतं. राहण्यात फरक पडू लागतो. आस्ते आस्ते त्याचा ‘बाबा’ किंवा गुरू व्हायला लागतो. ईश्वराची उपासना करताना अपेक्षित नसलेलं होऊ लागतं. त्याला आपण ‘कुणीतरी’ आहोत असं वाटायला लागतं. आपल्याला बरंच काही समजतं, अशी त्याची समजूत होते. तशी ती होण्यात अनेकदा त्याच्या भोवताली जमणारी माणसंच जबाबदार असतात.
रामदास स्वामी म्हणतात, ‘जनीं हित पंडित सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले।।…’ आज गावागावांतून असे ‘ब्रह्मराक्षस’ दिसतात. तुकाराम महाराज सांगतात, ‘पंडित तो भला। नित्य भजे जो विठ्ठला।। अवघे सम ब्रह्म पाहे। सर्वांभूती विठ्ठल आहे।। रिता नाही कोणी ठाव। सर्वां भूतीं वासुदेव।। तुका म्हणे तोचि दास। त्या देखिल्या जाती दोष।।’

