देशात जसे सण-उत्सवाचे वातावरण सुरु होते तसे सामान्य घरातील खर्चही वाढतात. बहुदा यंदाचे सण-उत्सव सामान्य घरांसाठी जास्त खर्चिक ठरणार आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये वाढत्या तणावाचा परिणाम भारतातील सामान्य कुटुंबियांच्या खिशावर होताना दिसत आहे. मुळात, यामागे अनेक कारणेही आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाची किंमत वाढली आहे. FMCG कंपन्यांनी कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे. परिणामी, दैनंदिन जीवनातील वापरात येणाऱ्या वस्तूंची किंमत वाढली आहे. या वस्तूंमध्ये टूथपेस्ट, डिटर्जंट, पेंट, चहा यांचा समावेश आहे.
स्वतः हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने चाहूल दिली आहे की, येत्या काही दिवसांत डिटर्जंट तसेच कपडे धुण्याच्या बारसह संबंधित उत्पादनांची किंमत वाढवण्यात येणार आहे. परदेशात असणाऱ्या तणावपूर्ण वातावरणामुळे कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून कच्च्या तेलापासून तयार होणाऱ्या वस्तूंची किंमतही वाढणार आहे. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या किमतीतही वाढ दिसून येऊ शकते.
येत्या दिवसांत कोणत्या भारतीय कंपन्यांमध्ये किंमतवाढ दिसून येईल आणि का?
सणासुदीचे दिवस उंबरठयावर आहेत. अशामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरसहित एशियन पेंट्स, Havells तसेच इतर FMCG कंपन्यांच्या दरात वाढ दिसून येऊ शकते. परदेशात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे भारतीयांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसेच मध्य पूर्वी आशियाई भागात वाढत्या तणावामुळे जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचाच परिणाम Freight Cost वाढला आहे. परिणामी, भारतात दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तू महागणार आहेत.
वाढता दबाव कमी करण्यासाठी ग्राहकांचा वापर?
नवरात्र, दिवाळी, रक्षाबंधन आणि बरेच सण आता उंबरठ्यावर आहेत. हा सणांचा हंगाम म्हणजे कंपन्यांसाठी सुवर्णसंधी असते. या हंगामात कंपन्या जास्तीची कमाई करतात. अशामध्ये काही वृत्तांनुसार, सध्या देशातील ग्रामीण आणि शहरी भागात स्थिर मागणी दिसत आहे, त्यामुळे कंपन्यांसाठी दरवाढीसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. जून महिन्यात किरकोळ विक्रीत 6 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे, जी मे महिन्यापेक्षा उत्तम आहे. युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका कच्च्या मालावर होत आहे, जेणेकरून अनेक भारतीय कंपन्या सध्या दबावाखाली आहेत, त्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात वाढत्या दरांचा अंदाज पाहता कंपन्या स्वतःचा दबाव कमी करण्यासाठी ग्राहकांचा वापर करत आहेत अशी चर्चा सुरु आहे.

