सध्या स्कॉटलंडमध्ये राष्ट्रकुल खेळ चाललेत अन् त्यात भारताकडून अपेक्षेप्रमाणं दमदार कामगिरी झालीय ती वेटलिफ्टिंगमध्ये. त्याचं नेतृत्व केलंय ते सुवर्णपदक कमावणाऱ्या मीराबाई चानूनं…राष्ट्रकुलमधील हे तिचं सलग तिसरं जेतेपद. दुखापतींतून अन् विविध स्पर्धांत पदकांनी हुलकावणी दिल्यानं आलेल्या निराशेतून उसळी घेत मीराबाईनं वारंवार केलेलं पुनरागमन हे कौतुकास्पदच…आता तिला वेध लागलेत ते उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आशियाई खेळांचे. चानूला आजवर पदक जिंकता आलेली नाही अशी ही एकमेव स्पर्धा…
त्यच ग्लासगो शहरात ‘तिच्या’ राष्ट्रकुल खेळांतील प्रवासाचं एक महत्त्वपूर्ण वर्तुळ पूर्ण झालं. तिथंच ‘तिनं’ सुऊवात केली होती. वर्ष 2014…19 वर्षांची ‘ती’ भारतीय खेळाडू 2013 च्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत 48 किलो वजन गटात एकूण 166 किलो वजन उचलून. सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्कॉटलंडमधील त्या स्थळी दाखल झाली…तिथं ‘तिनं’ आपली एकूण कामगिरी सुधारली अन् 170 किलोपर्यंत मजल मारली. परंतु अत्यंत कमी फरकानं सुवर्णपदक हुकलं…यावेळी मात्र ‘तिला’ मागं टाकणारं किंवा आव्हान देणारं कुणीही नव्हतं. ‘तिनं’ त्या वेळच्या वजनापेक्षा 24 किलो जास्त उचलत यावेळी साजरी केली ती राष्ट्रकुल खेळांतील सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक…वेटलिफ्टर मीराबाई चानू…
12 वर्षांपूर्वीच्या त्या राष्ट्रकुल खेळांत लढत रंगली होती ती मणिपूरच्याच दोन वेटफिल्टर्समध्ये. ‘स्नॅच’ प्रकारानंतर संजिता चानू आघाडीवर होती आणि ‘क्लीन अँड जर्क’मध्येही दोघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. अखेरीस संजितानं तिच्या शेवटच्या प्रयत्नात एकूण 173 किलोची कामगिरी नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केलं…बरोबरी साधण्यासाठी मीराबाईनं तिच्या अखेरच्या प्रयत्नात 98 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती थोडक्यात अपयशी ठरली. तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं अन् विजेत्यापेक्षा मागं राहिली ती केवळ तीन किलोंनी…
यावेळी मात्र त्याच ग्लासगोमध्ये पाहायला मिळालं ते मीराबाई चानूचं निर्विवाद वर्चस्व…तिनं राष्ट्रकुल खेळांत सलग तिसरं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचलाय. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला वेटलिफ्टर…यादरम्यान 31 वर्षीय मीराबाईनं उचललं ते 48 किलो गटात ‘स्नॅच’मध्ये 85 किलो, तर ‘क्लीन अँड जर्क’मध्ये 105 किलो असं एकूण 190 किलो वजन…इतर स्पर्धकांच्या तुलनेत चानू किती तरी पुढं गेलीय याची ही साक्ष. खेरीज प्रत्येक स्पर्धेसरशी तिची कामगिरी सुधारत गेलीय हे महत्त्वाचं…
2018 च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत 48 किलो गटात मीराबाईनं एकूण 196 किलो वजन उचलून (86 किलो ‘स्नॅच’, 110 किलो ‘क्लीन अँड जर्क’) विक्रमांची नोंद करत रौप्यपदक विजेत्यावर तब्बल 30 किलोंची आघाडी घेतली होती….चार वर्षांनंतर बर्मिंगहॅममध्ये तिनं 49 किलो गटात उतरताना आणखी पुढं पाऊल टाकलं ते 201 किलो वजन पेलून (88 किलो ‘स्नॅच’, 113 किलो ‘क्लीन अँड जर्क’). तिथंही चानूनं मोठ्या फरकानं आपलं विजेतेपद कायम राखण्यात यश मिळविलं…
मीराबाई चानूच्या वाटचालीचा आढावा घेताना ग्लासगोमधील दोन स्पर्धांच्या दरम्यान काय घडलं तेही पाहणं आवश्यक…2017 मध्ये ती जागतिक विजेती बनली आणि वेटलिफ्टिंगमधील वैश्विक किताबाच्या बाबतीत भारताची दोन दशकांपासून चाललेली प्रतीक्षा संपवली. त्यानंतर नोंद झाली ती गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल खेळांतील धडाकेबाज कामगिरीची…परंतु पाठीच्या दुखापतीमुळे मीराबाईला 2018 च्या आशियाई खेळांतून माघार घ्यावी लागली. तिनं पुनरागमन करत टोकियो येथील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं. 20 वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या वाट्याला आलेलं ते पहिलं ऑलिम्पिक पदक…
त्यानंतर बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल खेळांत आणखी एक सोनेरी कामगिरी…मात्र कोविडमुळं पुढं ढकलण्यात आल्यानं 2023 मध्ये झालेल्या हांगझाऊ आशियाई खेळांत चानूच्या कामगिरीला दुखापतीचा फटका बसला अन् तिला समाधान मानावं लागलं ते चौथ्या स्थानावर…पॅरिस ऑलिम्पिकमध्येही चौथ्या स्थानावरच राहावं लागलं…पण त्यानंतर मीराबाई चानूनं 2025 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावून दमदार पुनरागमन केलं…ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा व राष्ट्रकुल या सर्व प्रतिष्ठेच्या क्रीडास्पर्धांमध्ये ती पदकाची मानकरी ठरलेली असली, तरी एक पदक मात्र तिला अजूनही हुलकावणी देत आलंय ते आशियाई खेळांतलं…
2014 मधील पदार्पणाच्या ‘एशियाड’मध्ये मीराबाई नवव्या स्थानावर राहिली, तर 2018 साली दुखापतीमुळं माघार अन् 2023 मध्ये अत्यंत कमी फरकानं कांस्यपदकाची हुलकावणी…त्यामुळंच राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेली असली, तरी तिनं सर्वस्व पणाला का लावलं नव्हतं ते यावरून स्पष्ट होतं…‘मी राष्ट्रकुल स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार नाही. माझं लक्ष आहे ते आशियाई खेळांवर. ती अगदी जवळ आलीय. मी त्यानुसारच सराव करतेय’, मीराबाईनं ग्लासगोमधील जेतेपदापूर्वी व्यक्त केलेलं मनोगत…
रविवारी ‘स्नॅच’ व ’क्लीन अँड जर्क’ या दोन्ही प्रकारांतील सुऊवातीचे प्रयत्न अयशस्वी ठरूनही चानूची ही मानसिकता बदलली नाही…‘आम्ही या स्पर्धेत खूप जास्त जोर लावणार नव्हतो, पण माझ्या स्वत:च्या चुकीमुळं पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. सरावात काय चाललंय आणि आणखी काय सुधारणांची गरज आहे हे पाहणंही गरजेचं. माझं शारीरिक वजन 48 किलोपर्यंत कमी करणं हीच खूप कठीण गोष्ट होती’ सुवर्णपदक जिंकल्यानंतरचे तिचे शब्द…स्नॅच’मध्ये 90 किलो वजन उचलण्याचं आव्हान पेलण्यासाठी मीराबाईला आणखी वाट पाहावी लागेल, आशियाई खेळांत ते साध्य करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, ती सांगते…
जपानमधील नायोगा इथं आशियाई खेळ रंगतील ते 19 सप्टेंबर असून मीराबाई चानूच्या दृष्टीनं त्याला जास्त महत्त्व येण्यामागं आणखी एक कारण दडलंय…आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघानं 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमधून 48 किलो व 49 किलो हे दोन्ही वजनी गट वगळलेत. 2014 मधील ग्लासगोपासून यंदाच्या ग्लासगोपर्यंत मीराबाईच्या कारकिर्दीला आकार दिला तो याच गटांनी. त्यामुळं तिला त्या गटात आपला पराक्रम दाखविण्याची शेवटची संधी मिळेल ती जपानी भूमीत. म्हणूनच या कथेचा खरा शेवट ग्लासगोमध्ये नाही, तर नागोयामध्ये होईल !
शारीरिक वजनाशी लडाई
- वजनाच्या मर्यादेत बसण्यासाठी मीराबाई चानूनं कमी केलं ते 2.5 किलो वजन. हे काही सोपे काम नव्हतं. म्हणूनच या स्पर्धेत तिनं खूप जास्त जोखीम पत्करली नाही, प्रशिक्षक विजय शर्मा यांनी तिच्या रणनीतीवर टाकलेला प्रकाश…
- ‘जेव्हा मी 49 किलो गटात उतरायचे तेव्हा आहारावर किंवा वजनावर इतकं कडक नियंत्रण ठेवावं लागत नसे. पण 48 किलो गटात टिकून राहण्याच्या दृष्टीनं वजन कायम राखणं हे एक मोठं आव्हानच. या गटातील हे माझे शेवटचे राष्ट्रकुल खेळ असल्यानं मी स्वत:ला सांगितलं की, मी हे करू शकते. एखाद्या खेळाडूसाठी शरीराचं वजन नियंत्रणात ठेवणं ही अनेकदा सर्वांत कठीण लढाई असते. मी माझ्या आहाराकडे बारकाईने लक्ष दिलं’, मीराबाईनं दिलेली माहिती…
- तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली चानू आशियाई खेळांमध्ये 48 किलो गटात भाग घेईल आणि त्यानंतर 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये उतरेल ती 53 किलो गटात…
- ‘आम्ही परिस्थितीनुसार पुढील पावलं उचलू. आमचं मुख्य लक्ष्य आहे ते आशियाई खेळ. मीराबाई चानूच्या पदकांच्या संग्रहात उणीव आहे ती याच स्पर्धेतील पदकाची’, प्रशिक्षक शर्मा म्हणतात…
- ग्लासगोमध्ये विजय मिळाला असला, तरी शर्मा यांनी मान्य केलं की, चानूची कामगिरी पूर्णपणे निर्दोष नव्हती…‘स्नॅच’ आणि ‘क्लीन अँड जर्क’ या दोन्ही प्रकारांत तिचे पहिले प्रयत्न अयशस्वी ठरले. तसं व्हायला नको होतं. आम्ही स्वत:समोर उच्च निकष ठेवतो. एकाग्रतेत थोडी त्रुटी राहिली होती, पण सरावादरम्यान आम्ही त्यावर नक्कीच काम करू, ते सांगतात…
लाकडाच्या मोळ्यांचा भार ते वेटलिफ्टिंग
- मीराबाई चानू लहानपणी लाकडाच्या मोळ्यांचा भार वाहून न्यायच्या. तिचं वेटलिफ्टिंग कौशल्य घडलं ते त्यातूच…
- अवघ्या 12 व्या वर्षीच तिच्यातील असाधारण ताकदीची चिन्हं दिसू लागली. चानू डोंगरावरून लाकडाची जड ओझी वाहून आणत असे. या मोळ्या उचलणं तिच्या थोरल्या भावांनाही कठीण जायचं…हे साधं वाटणारं काम पुढं तिला भारताच्या सर्वांत यशस्वी वेटलिफ्टर्सपैकी एक बनवेल याची कोणालाच कल्पना नव्हती.
- ‘मी माझ्या भावंडांना आणि पालकांना लाकडाच्या मोळ्या वाहून नेण्याच्या तसंच दूरवरून पाणी आणण्याच्या बाबतीत मदत करत असे. मला तेव्हाच माझ्यातील उपजत ताकदीची जाणीव झाली होती. त्यामुळं वेटलिफ्टिंगच्या दृष्टीनं आवश्यक कौशल्य माझ्याकडे आहे याची जाणीव झाल्यानंतर मी या खेळाकडे वळले. आईनंही मला वेटलिफ्टिंग स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिलं’, मीराबाई सांगतात…
– राजू प्रभू
