![]()
शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे, फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. गेल्या महिन्याभरापासून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून आणि सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. मात्र, या सर्व तर्क-वितर्कांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णविराम लावला असून, “मी सध्या मुंबईतच असून यापुढेही महाराष्ट्रातच राहणार आहे,” असे स्पष्ट करत केंद्रात जाण्याच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. मोदींच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू असल्या तरी, खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काल पंढरपूर येथे सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर ‘जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं’ अशी सूचक प्रतिक्रिया देत, आपण सध्याच्या भूमिकेत पूर्णपणे समाधानी असल्याचे सांगत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या सर्व चर्चांना पुन्हा एकदा पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर भक्कम पकड असणारे आणि राज्यात भाजपचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक दिग्गज नेते मानले जातात. त्यांच्याच नेतृत्वात आणि कार्यकाळात राज्यात अनेक मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लागल्याने त्यांची ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ अशी ओळख निर्माण झाली आहे. एकीकडे महाराष्ट्रात फडणवीसांच्या भक्कम नेतृत्वाची चर्चा असतानाच, दुसरीकडे ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे काल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना द्याव्या लागलेल्या राजीनाम्यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वाढत्या तिव्रतेनंतर केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. तसेच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचे आयोजन देखील केले होते.
Source link
'मी महाराष्ट्रातच राहणार!':मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम, नेमके काय म्हणाले?
