![]()
नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असेही म्हटले. फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांच्यात खरोखर हिंमत असेल, लोकशाही आणि संविधानावर विश्वास असेल तर त्यांनी संसदेत चर्चा करावी. चर्चेची सर्वात महत्त्वाची जागा संसद आहे. मग चर्चेपासून पळ का काढता? कारण तुमची पोलखोल होईल, याची तुम्हाला भीती वाटते.” त्यांनी पुढे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सरकारांचा उल्लेख करत, “कर्नाटक, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात आठ वेळा पेपर लीक झाले. पंजाबमध्येही आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये पेपर लीकची प्रकरणे घडली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणे बंद करा,” असा आरोप केला. मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांकडे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर त्या संसदेत मांडाव्यात. “सरकारला योग्य निर्णय घेण्यासाठी मजबूर करा. मात्र विद्यार्थ्यांचा वापर करून केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. विद्यार्थ्यांशी तुम्हाला काहीही देणेघेणे नाही, फक्त राजकारण करायचे आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींना आव्हान फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात कठोर कारवाई सुरू केली आहे. पेपर लीक करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नीटची फेरपरीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली असून त्यामुळे पुढील परीक्षांचाही मार्ग मोकळा झाला आहे. ते म्हणाले, “पंतप्रधानांवर विश्वास ठेवला पाहिजे. काँग्रेसच्या काळात शिक्षणासाठी केवळ 8 हजार कोटी रुपयांचे बजेट होते. आज ते वाढून 1 लाख 39 हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एम्स, आयआयटीसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये संधींची दारे खुली झाली आहेत. हे मोदी सरकारच्या धोरणांमुळे शक्य झाले आहे.” शेवटी फडणवीस यांनी पुन्हा एकदा विरोधकांना आव्हान देत म्हटले, “राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांनी पळपुटेपणा सोडावा आणि संसदेत चर्चेला यावे. विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर हिंमत दाखवा. लोकशाहीत चर्चा रस्त्यावर होत नाही, ती संसदेत होते. विद्यार्थीहिताचे निर्णय आंदोलनातून नव्हे तर चर्चेतूनच होऊ शकतात. मोदी सरकार विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहे.” फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर पलटवार; ‘विद्यार्थी आंदोलनातून अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ठाकरे बंधू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या पक्षाचे राजकीय अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत संबंधित पोलिसावर तातडीने कारवाई करण्यात आल्याचे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, आंदोलनाच्या नावाखाली काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक आणि हल्ले करण्यात आले. अशा घटना पाहता काही समाजकंटक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फायदा घेत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा प्रवृत्तींपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “ते केवळ आपल्या पक्षाचे अस्तित्व शोधत आहेत. त्यांच्या पक्षाची राजकीय जमीन सरकली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ती परत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.” यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. “महाराष्ट्रातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला. त्या प्रकरणात अनेक जण सहभागी असल्याचे समोर आले, त्यात त्यांच्या मंत्र्यांचाही समावेश होता. निकालात गुण वाढवून उमेदवारांना उत्तीर्ण केल्याचे प्रकारही त्याच काळात झाले. त्यामुळे आता ते कोणत्या तोंडाने पेपरफुटीबाबत बोलत आहेत?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. मुंबई पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरही भूमिका मुंबई पोलिसांच्या एका व्हायरल व्हिडिओबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना इतर गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या व्हिडिओबाबत ते म्हणाले, “तो व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही त्याची गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारचे वर्तन पूर्णपणे चुकीचे आहे. संबंधित पोलिसाविरोधात तातडीने कारवाई करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी सुरू आहे.” विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही सेलिब्रिटी सहभागी होत असल्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, काही जण खरोखरच चांगल्या हेतूने आंदोलनात सहभागी होत असतील. मात्र काही जण केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर ‘रील’ बनवण्यासाठी आंदोलनाचा वापर करत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींपासून सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. हेही वाचा… नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार:26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. राज ठाकरे म्हणाले की, देशभरात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते. मात्र, त्याला दडपण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात येत आहे. या कारवाईचे पडसाद आता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही उमटत असल्याचे त्यांनी सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला यावं:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान, म्हणाले- विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर राजकारण करू नका
