Headlines

मृत्यूछायेत निवारा! मुंबई महानगर प्रदेशात 8014 इमारती धोकादायक; कोणत्या परिसरात धोका अधिक? – mumbai metropolitan region 8014 buildings are dangerous which areas at higher risk


श्रीकांत सावंत, ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) धोकादायक इमारतींचे वास्तव दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या आठ महापालिका क्षेत्रांमध्ये एकूण ७,८४० धोकादायक इमारती आढळल्या आहेत. त्यापैकी ७६५ आणि मुंबईतील १७४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असूनही हजारो कुटुंबे मृत्यूच्या सावटाखाली राहत आहेत.

भिवंडीतील बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील कोहिनूर इमारत कोसळून गुरुवारी १० जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी सन २०२०मध्ये पटेल कंपाऊंडमधील जिलानी इमारत दुर्घटनेत ३८ जणांनी प्राण गमावले होते.
Maharashtra TimesPune Crime : नुकतंच लग्न, तरीही फ्लॅटमध्ये एकटेच, पत्नीसोबत वाद अन् घटस्फोटाची चर्चा, पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमध्ये धक्कादायक घडलं
ढिगाऱ्याखालून बाहेर पडणारे मृतदेह, आपल्या माणसांच्या शोधात रात्रभर थांबलेले नातेवाईक आणि प्रत्येक दुर्घटनेनंतर होणाऱ्या कारवाईच्या घोषणा हे या भागांचे पावसाळी वास्तव बनले आहे. तरीही हजारो नागरिक आजही अतिधोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहत असून, पुढची दुर्घटना कुठे घडेल, याचीच भीती त्यांना सतावत आहे. प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो; मात्र दुर्घटनेनंतरच्या घोषणा, नोटिसा आणि कारवाई यापलीकडे ठोस उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे.

महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींच्या याद्या जाहीर करतात. नोटिसा बजावणे, वीज-पाणीपुरवठा खंडित करणे, इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देणे आणि काही ठिकाणी पाडकाम करणे, अशी कारवाई केली जाते. मात्र, पुनर्वसनाचा प्रश्न, पागडी पद्धतीतील भाडेकरूंचे हक्क, न्यायालयीन वाद आणि नागरिकांचा विरोध यामुळे इमारती रिक्त करता येत नाहीत. त्यामुळे जीवितहानीचा धोका कायम आहे.

Maharashtra TimesRaj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप
ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४,४३७ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी ९७ इमारती अतिधोकादायक आहेत. नौपाडा-कोपरी विभागातच ५१ अतिधोकादायक इमारती असल्याने हा परिसर सर्वाधिक संवेदनशील मानला जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ७१६ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २२५ अतिधोकादायक आहेत. ‘एमएमआर’मध्ये अतिधोकादायक इमारतींची सर्वाधिक संख्या याच महापालिका क्षेत्रात नोंदली गेली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५०४ धोकादायक इमारती असून, ५२ अतिधोकादायक आहेत. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी काही भागांत पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली होती. मिरा-भाईंदरमध्ये ४५३ धोकादायक इमारती असून, ३८ अतिधोकादायक आहेत. मुदतीत इमारती रिकाम्या न केल्यास त्या पाडून खर्च संबंधित सोसायट्यांकडून वसूल करण्याचा इशारा दिला आहे.

भिवंडीत धोका मोठा
भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात १,३०९ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २०५ इमारती ‘सी-१’ श्रेणीत आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा आकडा १,७००च्या पुढे गेल्याची नोंद आहे.
Maharashtra TimesCJP Protest: तुमचा कॅप्शन गेम खूपच कमजोर! CJP आंदोलनातील मराठमोळ्या तरुणीचा स्वॅग; भाजपला सणसणीत प्रत्युत्तर
वसई-विरार, पनवेलमध्ये कारवाईचा इशारा
वसई- विरारमध्ये ७४ अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यापैकी १९ इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे. पनवेलमध्ये ६४ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, त्या रिकाम्या न केल्यास वीज-पाणीपुरवठा खंडित करून पोलिस बंदोबस्तात निष्कासनाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. एमएमआर’मधील धोकादायक इमारतींचा प्रश्न केवळ बांधकाम सुरक्षेपुरता नाही. तो पुनर्वसन, नागरी हक्क, प्रशासनाची अंमलबजावणी क्षमता आणि सुरक्षिततेशी थेट जोडला गेला आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी याद्या जाहीर करून न थांबता, पुनर्वसनासह वेगवान आणि ठोस कारवाईची गरज आहे.

उल्हासनगरात १४४ इमारतींचे ऑडिट प्रलंबित
उल्हासनगरमध्ये २८३ धोकादायक इमारती असून, सहा इमारती अतिधोकादायक आहेत. मात्र, शहरातील १४४हून अधिक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात धोकादायक इमारतींची संख्या महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत १७४ इमारती अतिधोकादायक
मुंबई : मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबईत एकूण १७४ इमारती अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या घोषित केल्या होत्या. त्यामध्ये १४१ खासगी इमारतींचा समावेश आहे. यापैकी एकूण ३२ इमारती शहरातील, ८० पश्चिम उपनगरांतील आणि २९ पूर्व उपनगरांतील आहेत. या इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी सूचना आणि आवाहन करण्यात आले आहे. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील, असे महापालिकेकडून आधीच स्पष्टही करण्यात आले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत