महाराष्ट्राच्या राजकारणात विधाने, वाद आणि त्यावरून रंगणाऱ्या राजकीय फैरी काही नव्या नाहीत. मात्र, जेव्हा विषय लाखो तरुण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शैक्षणिक व्यवस्थेच्या विश्वासाशी जोडलेला असतो, तेव्हा राजकीय नेत्यांच्या एका शब्दालाही मोठे वजन प्राप्त होते. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी NEET परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे सध्या संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. पेपरफुटीसारख्या अत्यंत गंभीर आणि संवेदनक्षम विषयाची तुलना त्यांनी थेट ‘आंबा चोरी’शी केल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर कडवट टीका होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांनी या विधानाचा खरपूस समाचार घेत सरकारला घेरले आहे. हा संपूर्ण वाद नेमका काय आहे? चंद्रकांत पाटील यांनी नक्की काय विधान केले? त्यावर विरोधकांनी काय प्रत्युत्तर दिले आणि या वादाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..