Headlines

पुणेकरांचे हाल होणार! शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा; पाणीकपात कधीपासून लागू करणार?| Maharashtra Times


Pune News: पुणे महानगरपालिका पुन्हा एका दिवसाआड पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणार आहे, जेणेकरून भविष्यात वाढणारी मागणी भागवण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहील.

पुणे पाणीकपात
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: मागील आठवड्यातील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाली असली, तरी आता पावसाने उघडीप दिली आहे. यंदा कमी पर्जन्यमानाचा अंदाज आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन व वापर आवश्यक असल्याने शहरात उद्यापासून (बुधवार, १५ जुलै) तातडीने पुन्हा दिवसाआड पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय असल्याने पर्जन्यमान कमी राहण्याचा इशारा हवामान विभागाने पूर्वीच दिला आहे. पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील एकूण पाणीसाठा चार अब्ज घनफूटांपेक्षाही (टीएमसी) कमी झाला होता. त्यामुळे तातडीने पाणीकपात लागू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने १५ जूनपासून शहरात सम-विषम तारखांनुसार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. याखेरीज वॉशिंग सेंटर्स बंद करणे, बांधकामांसाठी पिण्याचे पाणी न वापरणे आदी नियम लागू केले. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत झाली. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सात ते १२ जुलैदरम्यान पाणीकपात रद्द करण्यात आली होती.

Maharashtra TimesPune Revenue Scam: महसूल विभागातील 15 अधिकारी निलंबित; कलम 155चा गैरवापर केल्याने सरकारचा दणका, प्रकरण काय?

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत १६.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा ४.१२ टीएमसीने कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे शहरात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.

पावसाने उघडीप दिल्याने चिंता

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सोमवारी १६.८९ ‘टीएमसी’ पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २१ ‘टीएमसी’ इतका पाणीसाठा होता. यंदा शहरात गेल्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसाने आठवडाभरापासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यामध्येही पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून हलक्या सरी हजेरी लावत आहेत. घाट माथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. तापमानातही वाढ झाली आहे. अनुकूल वातावरण नसल्याने पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता नसून, दुपारनंतर आकाश मुख्यत: ढगाळ राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. महिनाअखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा एकूणच पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने पाणीकपातीचे पुणेकरांवरील संकट कायम राहणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.

Maharashtra TimesMaharashtra Weather: ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज

“काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वाढती पाण्याची मागणी आणि पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन पुन्हा पाणीकपात लागू करावी लागणार आहे. धरणे शंभर टक्के भरेपर्यंत कपात सुरू ठेवावी लागेल,” असं पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी नमूद केलं.

दोन दिवसांपूर्वीच महापालिकेने तूर्तास पाणीकपात नाही अशी घोषणा केल्यानंतर पुन्हा आता यू-टर्न घेतला आहे. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा