श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या ध्रुव जुरेल याने शतकीय कामगिरी केली आहे. या शतकाचे सेलीब्रेशन करताना त्याने त्याच्या शरीरावरील टॅटू दाखवला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल याने एक अविस्मरणीय आणि तितकंच भावूक करणारं शतक झळकावलं आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच पिसं काढली. पण, या शानदार खेळीनंतर त्याने ज्या अंदाजात सेलिब्रेशन केलं, त्याने प्रत्येक भारतीयाचं मन जिंकून घेतलं आहे. त्याच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘जय जवान, जय किसान’ टॅटूची चर्चा
असिथा फर्नांडोच्या चेंडूवर एक धाव घेत जुरेलने आपलं दुसरं कसोटी शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण होताच त्याने हवेत ठोसा मारून आपला आनंद व्यक्त केला. पण त्यानंतर त्याने हेलमेट काढलं आणि आपला डावा हात उंचावून बायसेप्सवर गोंदवलेला ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू संपूर्ण जगाला अत्यंत अभिमानाने दाखवला.
ध्रुव जुरेलचं हे सेलिब्रेशन अतिशय खास होतं. त्याचे वडील नेम सिंह जुरेल हे भारतीय लष्कराचे माजी जवान असून त्यांनी कारगिल युद्धात देशाची सेवा केली आहे. देशाचे रक्षक आणि अन्नदाते यांना समर्पित असलेला हा टॅटू जुरेलच्या मनातील देशभक्ती आणि त्याच्यावर झालेल्या कौटुंबिक संस्कारांची साक्ष देतो. दुसऱ्या बाजूला उभा असलेला मोहम्मद सिराज यानेही धावत येत जुरेलला मिठी मारली आणि या सुवर्णक्षणाचा आनंद द्विगुणित केला.
या शतकी खेळीसह ध्रुव जुरेलने एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेत ७ व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा तो आतापर्यंतचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा पराक्रम फक्त हार्दिक पंड्या (१०८ धावा, पल्लेकेले, २०१७) यालाच करता आला होता. आता जुरेलने त्याच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकड डिसेंबर २०२४ मध्ये मेलबर्न कसोटीत नितीश कुमार रेड्डी (११४ धावा) याने ७ व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर शतक झळकावलं होतं. त्यानंतर अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा जुरेल हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा