सिनेविश्वात मानाचा मानला जाणारा फिल्मफेअर ॲवॉर्ड मराठी २०२६ सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला मराठी तसंच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली तर राजदत्त यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चित्रपटसृष्टीतील लाडकी ब्लॅक लेडी कुणाला मिळते, याची उत्सुकता गुरुवारी झालेल्या रंगतदार सोहळ्यात बघायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाला मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती होती. यंदा पुरस्कार सोहळ्याचे ११वे वर्ष होते. विलेपार्ले येथील हॉटेल सहारा स्टारमध्ये हा फिल्मफेअर ॲवॉर्ड मराठी २०२६ सोहळा पार पडला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
‘राज’ हा शब्द स्वतःच्या नावापूर्वी जोडला
राजदत्त यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सचिन यांनी गौरव केला. ‘आमच्या दत्ताकाकांचा फिल्मफेअर मराठी पुरस्काराने सन्मान केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. त्यांचे पूर्ण नाव दत्ता मायाळू आहे. मात्र, दिग्दर्शक झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंचे ऋण मान्य करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच त्यांनी आपले गुरू राजा परांजपे यांच्या नावातील ‘राज’ हा शब्द स्वतःच्या नावापूर्वी जोडला आणि ते ‘राजदत्त’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मी साधारण साडेचार-पाच वर्षांचा असताना दत्ताकाका राजा परांजपे यांचे मुख्य सहायक होते आणि त्याच काळापासून आमचा एकत्र प्रवास सुरू झाला. राजाभाऊ अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही कामांत व्यग्र असायचे. त्यामुळे अनेक जबाबदाऱ्या दत्ताकाका सांभाळायचे. त्याचबरोबर ते माझीही काळजी घ्यायचे. रात्रीचे चित्रीकरण सुरू असताना मला थंडी वाजायची. ते मला उचलून स्टुडिओतील मोठ्या दिव्याजवळ घेऊन उभे राहायचे. त्यावेळी मला वाटले नव्हते की, इतक्या वर्षांनंतर त्यांनाच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याचा सन्मान मला मिळेल’, अशी भावना यावेळी सचिन यांनी व्यक्त केली.
Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा
‘आता थांबायचं नाय!’ने मारली बाजी
यंदाच्या सोहळ्यात ‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाने सर्वाधिक आठ पुरस्कार पटकावत बाजी मारली. तसेच दिलीप प्रभावळकर, अमृता सुभाष, ऋता दुर्गुळे, सिद्धार्थ जाधव, अनिता दाते आदी कलाकारांनी विविध श्रेणींमध्ये मानाचे पुरस्कार जिंकले. अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर या लोकप्रिय जोडीने या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले.

