आंदोलक-विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी : दीपके यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी शनिवारी दुपारी पसरताच जंतरमंतरवर जल्लोष सुरू झाला. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी ऐक्य चिरायू होवो’ अशा घोषणा देतानाच राष्ट्रगीतही गायले. तसेच नीट पेपरफुटीत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास सरकार आणि ‘सीजेपी’ यांच्यात पुन्हा चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री जे. पी. न•ा, जितेंद्र सिंह यांच्यासोबत सौरभ दास आणि आशुतोष रांका हे ‘सीजेपी’चे प्रतिनिधी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये चर्चेत सहभागी झाले होते.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर आंदोलकांनी जल्लोष सुरू केला. प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे समजताच अभिजीत दीपके आनंदाने गुडघ्यावर बसले. त्यांनी माईक हातात घेत जंतरमंतरवरील आंदोलकांना शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या अभिजीत दीपके यांना टायफॉइडची लागण झाली असून ते कॅन्युला लावलेले दिसले. अंगात ताप असूनही ते परखडपणे बोलताना दिसून आले. ‘सकाळ झाली आहे, जनता जागी झाली आहे. आम्ही असे निघून जाणार नाही. एकदा झुरळ आत शिरले की ते बाहेर जात नाही. आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे’, असे अभिजीत दीपके म्हणाले. आम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला सरकारला भाग पाडले असल्याचा दावाही त्यांनी केला.
पोलिसांकडून आंदोलकांना सूचना, लोकांनाही निर्देश
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर जल्लोष करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना हुसकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तुमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. मेट्रो स्टेशन पुन्हा सुरू झाली आहेत. सर्व आंदोलकांनी घरी जावे, असे सांगण्यात येत होते. याचदरम्यान पोलिसांनी एक मार्गसूची जारी करत शहरातील प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी नवी दिल्ली परिसरात प्रवास करणे टाळावे. प्रवाशांना विलंब टाळण्यासाठी आणि त्रासमुक्त प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला.
यशस्वी चर्चेनंतरच घरी परतणार : आशुतोष रांका
कॉक्रोच जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही जंतरमंतरवर माध्यम प्रतिनिधी आणि आंदोलकांशी संवाद साधला. आमच्या तीन मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यास आम्ही घरी जाऊ. आम्ही देशभरात शांततापूर्ण कँडल मार्च काढण्याची परवानगी मागितली आहे. सर्वांनी देशभरात सायंकाळी 6:00 वाजता कँडल मार्च काढावे’ असे त्यांनी स्पष्ट केले.
