![]()
नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीत गाजलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दीपकेंना ‘मातोश्री’वर बोलावल्याच्या वृत्तानंतर सत्ताधारी भाजपने ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी यावरून शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खिल्ली उडवली आहे. देहू रोड येथे भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन आणि रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेना अभिजीत दीपकेंना नेता मान्य करेल अभिजीत दीपके यांच्या भेटीगाठी आणि त्यांना आलेल्या ‘मातोश्री’च्या आमंत्रणावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आता अस्तित्व राहिले नाही. ते आपले अस्तित्व शोधण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिजीत दीपके यांच्या चर्चेचा विचार करता, कदाचित आगामी निवडणुका उद्धव ठाकरे हे अभिजीत दीपके यांच्याच नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्यांना आपला नेता म्हणून मान्य करेल,” असा उपरोधिक टोला गोरे यांनी लगावला. परिणय फुकेंचा टोला- डूबते को तिनके का सहारा भाजप नेते परिणय फुके यांनीही याच मुद्द्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसला लक्ष्य केले. “डूबते को तिनके का सहारा, अशी अवस्था सध्या शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसची झाली आहे. राजकीयदृष्ट्या कमकुवत होत चाललेल्या या पक्षांना अभिजीत दिपके यांच्या रूपाने एका काडीचा आधार मिळाला आहे. जनाधार गमावलेल्या विरोधकांकडे आता नव्या चेहऱ्यांच्या शोधाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. पण महाराष्ट्राची जनता विकासावर आणि महायुती सरकारच्या कामावर विश्वास ठेवते.” सभागृहात चर्चेऐवजी विरोधक रस्त्यावर दिल्लीत संसदेबाहेर विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागण्यात आल्याच्या मुद्द्यावर गोरे म्हणाले, “विरोधी पक्षाला काही काम आणि अजेंडा उरलेला नाही. लोकनियुक्त सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी संसदेत विकासात्मक चर्चा करणे आणि जनतेचे प्रश्न मांडणे अपेक्षित असते. पण त्याऐवजी ते लोकसभेच्या बाहेर येऊन राजीनामे मागत आहेत. हा त्यांचा रोजचाच कार्यक्रम झाल्याने जनता आता त्यांना फार गांभीर्याने घेत नाही.” रक्षा खडसेंच्या ऑडिओ क्लिपवर AIचा संदर्भ भाजप नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता गोरे म्हणाले, “सध्या ‘एआय’चा जमाना आलेला आहे. त्यामुळे कोणतीही ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप खरी आहे की बनावट, याची सत्यता आधी तपासावी लागेल. सत्यता समोर आल्यानंतरच त्यावर बोलणे उचित ठरेल.” मनोज जरांगेंचे समाधान होईल, सरकार काम करत आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर गोरे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवले आहेत आणि आरक्षणाचा मुद्दाही बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. गॅझेट लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र, निर्णय घेतल्यानंतर प्रशासकीय अंमलबजावणीला काही कालावधी लागतो. सरकार त्यादृष्टीने काम करत असून मनोज दादांचे नक्कीच समाधान होईल.” हेही वाचा… पुण्यात केवळ काँग्रेसचे नाही तर हे तमाम पुणेकरांचे आंदोलन:नीट पेपरफुटी, अमित शहांच्या दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात नीट पेपरफुटी प्रकरण आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज देशातील नवीन पिढी अस्वस्थ असून ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची आणि लाठीचार्जची पारदर्शकपणे ‘एसआयटी’ मार्फत चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात लढतील:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा खोचक टोला, शिवसेना त्यांना नेता म्हणून मान्य करेल
