![]()
महाराष्ट्रात शासकीय वसतिगृहांच्या प्रवेशातील वयाची अट रद्द करणे, रिक्त पदांची भरती आणि इतर मूलभूत मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे पुणे (मांजरी), नाशिक व नागपूर येथे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू असून, यावरून विरोधकांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार करत म्हटले आहे की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करुन राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा. सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करु शकते, गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे तर हजारदा संवाद साधण्याचीही तयारी ठेवत आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत लिखित आश्वासनही दिले आहे. सरकार विद्यार्थ्यांशी तीनदा चर्चा करू शकते, गरज पडल्यास चौथ्यांदा नव्हे तर हजार वेळा संवाद साधण्याचीही तयारी ठेवते. मग प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट का? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या पुढील महाराष्ट्र दौऱ्यापर्यंत आंदोलन पेटते ठेवण्याचा कॉंग्रेसचा डाव हा आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. कॉंग्रेसला राजकीय करिअर वाचवण्याची अधिक चिंता पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणे हा सरकारचा उद्देश आहे. मात्र काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय करिअर वाचवण्याची अधिक चिंता असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका आदिवासी समाजाच्या प्रश्नांशी खरोखरच काँग्रेसला आस्था असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन बनविण्याऐवजी सरकारसोबत संवाद साधावा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
Source link
सरकार हजारदा चर्चा करायला तयार सरकारची तयारी:विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना ‘रिलाँच’ करण्याचा काँग्रेसचा डाव- चंद्रशेखर बावनकुळे
