National Highway 48: मुंबई, ठाणे, पालघर, मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीच्या समस्या सुरू झाल्या आहेत. अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढत असून रस्ते सुरक्षेची कामं अपुरी आहेत
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वैष्णवी राऊत, वसई: राष्ट्रीय महामार्ग ४८ म्हणजेच, मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा मुंबई आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. प्रशासनाकडून वाहतूक नियोजनाचे दावे केले जात असले, तरी शनिवार-रविवारची वाढलेली वाहतूक आणि वारंवार होणारे अपघात यामुळे प्रवाशांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’
या महामार्गावर अनेक अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखले गेले असतानाही तेथे आवश्यक रस्ते सुरक्षा उपाययोजना अद्याप झालेल्या नसल्याने प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे. डिव्हायडरची कमतरता, अपुरे सूचना फलक, वेग नियंत्रण साधनांचा अभाव आणि धोकादायक वळणे यामुळे वारंवार अपघात घडत असून वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर या भागांना जोडणारी प्रमुख वाहिनी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घोडबंदर रस्त्यावरील दुरुस्ती कामांमुळे तब्बल १४ ते १५ तासांची वाहतूककोंडी झाली होती. त्यावेळी रुग्णवाहिका आणि शालेय बसेसही अडकल्या होत्या. सध्या वाहतूक पोलिसांनी काही प्रमाणात नियंत्रण मिळवले असले, तरी विकेंडला पर्यटकांची वाहने आणि अवजड वाहतूक वाढल्याने कोंडीचे सत्र पुन्हा सुरू आहे.
वाहतूक कोंडीसोबतच या महामार्गावर अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे. छोटा अपघात झाला तरी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या मार्गावर अनेक अपघातप्रवण ठिकाणे असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठोस उपाययोजना केलेली नसल्याचे काही पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. रस्त्यांची दुरवस्था, सूचना फलकांचा अभाव आणि अरुंद पूल यामुळे प्रवास धोकादायक ठरत आहेत. ‘आम्ही दररोज टोल भरतो, पण बदल्यात कोंडी आणि खड्डेच मिळतात,’ अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करत आहेत.
पावसाळ्यात कोंडीची भीती
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत टाकला जाणारा राडारोडा आणि आरएमसी प्रकल्पांमधील टाकाऊ माल यामुळे पाण्याच्या निचऱ्याचे मार्ग बंद होत आहेत. यावर उपाययोजना न झाल्यास यंदाही पावसाळ्यात कोंडी आणि पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
पेल्हार आणि सातिवली भागांत पादचारी पूल नसल्याने जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याच्या तक्रारी होत आहेत. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा