न्हावेली /वार्ताहर : पावसाच्या रिमझिम थेंबांसोबत शब्दांची पखरण करत पावसाळ्याच्या प्रसन्न संध्याकाळी रसिकमनाला भिजवून टाकणारी एक अमूल्य साहित्यिक मेजवानी रंगणार आहे. कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्या वतीने ‘काव्यांजली’ या विशेष काव्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बहारदार संध्याकाळी मंचावरून पावसाळी कवितांचे वाचन,स्थानिक कवी-लेखकांच्या स्वरचित कवितांचे जीवंत सादरीकरण आणि काव्यावर आधारित मधुर गायनाचा आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. शब्द, सूर आणि भावनांचा हा अनोखा त्रिवेणी संगम रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करेल.हा कार्यक्रम मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृह, मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
पावसात भिजणे हे शरीराला आनंद देते, तर कवितेत भिजणे मनाला तृप्त करते… या दोन्हीचा एकत्रित आनंद एकाच संध्याकाळी लुटण्याची ही उत्तम संधी आहे. या अनोख्या शब्दयात्रेत सर्व काव्यरसिकांनी, साहित्यप्रेमींनी आणि ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आग्रहाचे आवाहन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
