Headlines

नाते निरोगी राहण्यासाठी!:राग का येतो, दु:ख का होते, भावनांचे नियमन म्हणजे काय, ते कसे करावे?; जाणून घेऊयात…!




पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजा-सोनमची घटना विस्मरणात जाण्याआधीच या प्रकरणाने समाज पुन्हा एकदा हादरून गेला आहे. खरे तर आजच्या काळात माणसाने माणसाला मारणे खूपच सामान्य झाले आहे. रोज किमान आठ दहा बातम्या या खून, आत्महत्या, बदल्याची भावना या संदर्भात असतात. इतके खून होत आहेत. टोकाच्या घटना घडत आहेत. मात्र, केतन अग्रवाल प्रकरणाने समाजमन एवढे का हेलावले आहे…? नाते निरोगी राहण्यासाठी प्रेमासोबतच विवेकाचाही प्रकाश हवा असतो. खरे तर अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये लोकांचा पहिला प्रश्न असतो एखादी व्यक्ती प्रेम, लग्न किंवा नात्याच्या नावाखाली खून करण्यापर्यंत कशी पोहोचते? राग का येतो, दु:ख का होते? या साऱ्या प्रश्नावर उत्तर म्हणजे त्यासाठी मानसशास्त्रीय दृष्ट्या काही घटक महत्त्वाचे ठरतात. 1. भावनिक फसवणूक काही व्यक्ती नात्यात प्रेम, विश्वास आणि भविष्याची आश्वासने देतात. परंतु त्यामागे स्वार्थ, आर्थिक हेतू किंवा इतर उद्दिष्टे असू शकतात. अशावेळी समोरची व्यक्ती भावनिक दृष्ट्या गुंतत जाते आणि धोका ओळखणे ही कठीण होऊन जाते. 2.सहानुभूतीचा अभाव एखाद्याला इजा केल्यावर किंवा त्याचा जीव घेतल्यावर अपराधीपणा वाटत नसेल, तर त्या व्यक्तीमध्ये सहानुभूतीची कमतरता, व्यक्तिमत्वातील विकृती किंवा अत्यंत स्वकेंद्रित विचारसरणी असू शकते . 3.दुहेरी जीवन काही व्यक्ती वेगवेगळ्या लोकांसमोर वेगवेगळे चेहरे ठेवतात. बाहेरून प्रेमळ, सभ्य, विश्वासार्ह दिसणारी व्यक्ती आतून पूर्णपणे वेगळी असू शकते. 4. लोभ , सूड नियंत्रणाची गरज खुनामध्ये नेहमीच राग नसतो. कधी आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा, नात्यातील नियंत्रण गमावण्याची भीती किंवा सुडाची भावना कारणीभूत असू शकते. 5. हॅलो इफेक्ट्स जेव्हा एखादी व्यक्ती आकर्षक, शिक्षित किंवा सभ्य वाटते तेव्हा आपण तिच्या इतर गुणांबाबतही सकारात्मक गृहितके धरतो. त्यामुळे त्या व्यक्तीतील धोक्याचे संकेत दुर्लक्षित होऊ शकतात. पीडित व्यक्तीने धोका का ओळखला नाही, यामागेही त्याच्या काही मानवी नैसर्गिक प्रवृत्ती असू शकतात. 1. प्रेमात विश्वास ठेवण्याची गरज. 2. समोरच्या व्यक्तीतील चांगुलपणा पाहण्याची प्रवृत्ती. 3. नाते टिकवण्याची आशा. 4. विसंगती असूनही सत्य स्वीकारणे कठीण जाणे. खरे तर फसवली गेलेली व्यक्ती मूर्ख होती असे नाही, तर अनेकदा ते तिच्या विश्वासू आणि प्रेमळ स्वभावाचे द्योतक असते. अशा प्रकरणांमध्ये सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे विश्वासाचा ‘विश्वासघात’. शारीरिक मृत्यूपूर्वी अनेकदा भावनिक फसवणूक झालेली असते. जेव्हा प्रेम, सुरक्षितता, भविष्य यांचे प्रतीक असलेले नातेच धोक्याचे कारण बनते, तेव्हा समाजाला फक्त गुन्ह्याचाच नाही तर मानवी नात्यातील विश्वासार्हतेच्या तुटण्याचाही धक्का बसतो. अशा प्रकारच्या घटनांमधून कोण दोषी आहे एवढेच न पाहता मानवी मन, नात्यातील फसवणूक, विश्वास याचे मानसशास्त्र समजून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. नाती केवळ प्रेमावर नाही तर विश्वास, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि परस्पर आदर यावर टिकतात. प्रत्येक व्यक्तीची सजगता, भावनिक परिपक्वता, योग्य निर्णयक्षमता विकसित होण्याची गरज आहे. नात्यांमध्ये प्रेमासोबतच विवेकाचाही प्रकाश हवा. विश्वास नात्याचा पाया आहे आणि विवेक त्याचे संरक्षण. सर्वांना वारंवार एकच प्रश्न सतावतो आहे, जर सियाला हे लग्न मान्य नव्हते तर तिने स्पष्टपणे नकार का दिला नाही ? तिच्या वागणुकीतूनही तिने कधी नाराजी दर्शवली नाही आणि या सर्वाचा परिणाम म्हणजे केतनने आपले आयुष्य सियाकडे सोपवले. जिच्या सोबत त्याने भविष्याची स्वप्ने रंगवली तीच त्याचा कर्दनकाळ असेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल. अशा घटना घडल्यानंतर समाज माध्यमांवर विविध प्रकारचे पडसाद उमटतात. या सर्व प्रतिसादावरून समाज कोणत्या प्रकारची मानसिकता बाळगून आहे याचे प्रतिबिंबच उमटत असते. कधी कधी प्रश्न पडतो अशा संवेदनक्षम घटनेच्या वेळी देखील काही व्यक्ती असंवेदनशील कशा होऊ शकतात? काही लोकांमधील स्त्रीवाद अशावेळी देखील डोके वर काढतो. मृत पावलेली व्यक्ती पुरुष आहे की स्त्री याने काय फरक पडतो? सर्वात आधी तो एक माणूस आहे, हे का लक्षात येत नाही? आपण अशा प्रसंगी देखील स्पर्धा लावणार का? पुरुषांनी किती बायका मारल्या, तेवढ्याच बायकाही पुरुषांना मारतील! आपण एवढे असंवेदनशील कधीपासून आणि का झालो आहोत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपण निसर्ग दत्त फेमिनाईन शक्तीलाच तिलांजली देऊन घात करून घेत आहोत! Feminine Energy म्हणजे फक्त स्त्रियांमध्ये असणारी ऊर्जा नाही. ती एक मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक गुणवत्ता आहे जी स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असू शकते. ही ऊर्जा मुख्यतः स्वीकार, संवेदनशीलता, अंतर्ज्ञान, सर्जनशीलता, सहानुभूती आणि नातेसंबंधांशी जोडलेपणा यांच्याशी संबंधित असते. हिंसा या संकल्पनेबाबत जे. कृष्णमूर्ती यांची विचारसरणी खूपच उद्बोधक ठरते. कृष्णमूर्ती हिंसेला केवळ शारीरिक मारहाण किंवा आक्रमकते पुरते न ठेवता मनातील विभाजन, अहंकार, भीती असुरक्षितता, पूर्वग्रह, मानसिक संघर्ष यांच्याशी जोडतात. मी आणि तू यांच्यातील विभाजन जात, धर्म, राष्ट्र, विचारधारा यांचा अतिरेकी वापर, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, असूया, राग, द्वेष, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेली मानसिक भिंत, ही सर्व हिंसेचीच सूक्ष्म रूपे आहेत. आपण बहुतेक वेळा कोणत्याही गोष्टीवर पूर्ण लक्ष देत नाही किंवा ती घटना जशी आहे तशी बघत नाही. आपण ऐकत असतो, पण मन दुसरीकडे असते. आपण पाहत असतो, पण आपल्या ‘पूर्वग्रहांच्या चष्म्यातून’. आपण नातेसंबंधात असतो, पण खऱ्या अर्थाने समोरच्या व्यक्तीला समजून घेत नाही. पूर्ण लक्ष म्हणजे कोणतेही निष्कर्ष न काढता निरीक्षण करणे, स्वतःचा बचाव न करता, न्याय-अन्याय ठरवण्याची घाई न करणे, वास्तवात जसे आहे तसे स्वीकारणे. जिथे पूर्ण लक्ष जाते तिथेच जिव्हाळा, करुणा, प्रेम निर्माण होते आणि जिथे प्रेम आहे तिथे हिंसेला थारा राहत नाही! हजारो वर्षांपासून मानवाचा ‘डीएनए’ हा प्राण्याचाच आहे. तो कायम Survival मोडमध्येच असतो. स्व:सुरक्षा, स्वतःच्या गरजा पुरवणे हाच त्याचा प्राधान्यक्रम असतो. पण सिव्हिलायझेशन नंतर माणूस स्वतःला “अहिंसक” मानू लागला आहे जी त्याची खरी इमेज नसून आयडियल इमेज आहे. इथेच सगळी गडबड आहे. हा एक कॉग्नेटिव्ह डिझोनस आहे. हिंसेपासून पळणे म्हणजे उपाय नाही. सामान्यतः माणूस खालील तीन गोष्टी करतो… 1. हिंसेचा निषेध करतो. 2. हिंसेपासून पळ काढतो. 3. हिंसेचे समर्थन करतो. हे तिन्ही प्रकार Non Attention चे आहेत. आपण हिंसेला लक्षपूर्वक समजून घेत नसून फक्त प्रतिक्रिया देत असतो. जागरूकता ही बदलाची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण राग, असूया, भीती असुरक्षितता याकडे नि:पक्षपातीपणाने पाहतो, म्हणजेच ‘साक्षी’ भावाने पाहतो, तेव्हा त्या भावना आपली पकड सैल करतात. भावना दडपून टाकण्यापेक्षा किंवा त्याला नकार देण्यापेक्षा, सजग निरीक्षण अधिक परिवर्तन घडवते. जेव्हा आपण स्वतःकडे, आपल्या नात्यांकडे आणि जगाकडे Passive Awareness आणि Mindfully पाहतो; तेव्हा प्रेम, करुणा सहज निर्माण होते. जिथे प्रेम असते तिथे हिंसा विरघळून जाते. हिंसेच्या घटनांपासून मुक्त होण्यापेक्षा हिंसेच्या मानसिकतेतून मुक्त होणे अधिक गरजेचे. व्यक्तीच्या मनात हिंसा असेल तर समाजातही हिंसा असणारच. जगातील संघर्ष आणि अनिश्चितता ही प्रत्येक व्यक्तीच्या मनातील संघर्षाची एकत्रित अभिव्यक्ती आहे. म्हणून जगात शांती आणायची असेल, तर प्रथम प्रत्येकाने त्याच्या मनात शांती निर्माण करणे गरजेचे आहे. आपण अनेकदा शांतीची इच्छा व्यक्त करतो, पण मन मात्र स्पर्धा, मालकीचा भाव यामध्येच अडकलेले असते. आपल्या संघर्ष आणि दुःख यांची मुख्य कारणे शोधली तरच शांती मिळेल. मनाची शांती बाह्य घटकांद्वारे मिळणे कठीण असते. जेव्हा व्यक्तीच्या आत द्वंद्व असते, एक विचार काहीतरी सांगत असतो आणि दुसरा विचार काहीतरी वेगळेच मागत असतो. भीती आणि महत्त्वकांक्षा एकत्र असतात. प्रेम हवे असते, पण अहंकार सोडायचा नसतो आणि हाच अंतर्गत संघर्ष हिंसेतून प्रगट होतो. भावनांचे नियमन म्हणजे काय? भावनांचे नियमन म्हणजे आपल्या भावना दाबून टाकणे नव्हे, तर त्या समजून घेणे, स्वीकारणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे होय. प्रत्येक व्यक्तीला राग, दुःख, भीती, मत्सर, निराशा किंवा अपमान यांसारख्या भावना येतात. परंतु या भावना आल्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो, हे आपल्या भावनिक नियमनावर अवलंबून असते. भावनांचे नियमन नसल्यास क्षणिक रागात चुकीचे निर्णय घेतले जातात. आक्रमक वर्तन वाढू शकते. नातेसंबंध बिघडतात. नंतर पश्चात्ताप होईल अशा गोष्टी बोलल्या किंवा केल्या जातात. तणाव आणि मानसिक त्रास वाढतो. भावनांचे नियमन असल्यास व्यक्ती प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देते. परिस्थितीकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहू शकते. संघर्ष शांतपणे सोडवू शकते. नकार, अपयश आणि टीका सहन करण्याची क्षमता वाढते. नातेसंबंध अधिक निरोगी राहतात. भावनांचे नियमन करण्यासाठी काही उपाय 1. भावनेला नाव द्या. स्वतःला विचारा: मला नेमके काय वाटत आहे? राग, दुःख, भीती, अपमान की निराशा? भावना ओळखणे हे नियमनाचे पहिले पाऊल आहे. 2. थांबा आणि श्वास घ्या तीव्र भावना आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. काही खोल श्वास घ्या आणि स्वतःला थोडा वेळ द्या. 3. विचार तपासा स्वतःला विचारा: मी जे विचार करतोय ते पूर्णपणे सत्य आहेत का? दुसरा काही दृष्टिकोन असू शकतो का? भावना व्यक्त करा, कृती करू नका. 4 राग आला तर… कोणाशी बोला, लिहून काढा, चालायला जा, पण आवेगात निर्णय घेऊ नका. 5. स्वीकाराचा सराव करा जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. नकार, नुकसान आणि अपयश स्वीकारण्याची क्षमता भावनिक परिपक्वतेचे लक्षण आहे. भावना वाईट नसतात; त्यांच्याशी आपण कसे वागतो हे महत्त्वाचे असते. रागाच्या क्षणी संयम, दुःखाच्या क्षणी स्वीकार आणि आनंदाच्या क्षणी कृतज्ञता, हेच भावनिक संतुलनाचे सूत्र आहे. (लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत