Headlines

धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता:पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर




‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात पेटलेल्या आंदोलनाच्या आणि वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला थेट ‘घरचा आहेर’ दिला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशात लाठीचार्ज अन् संतापाची लाट पसरली नसती,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आणि सरकारच्या विलंबावर बोट ठेवताना छगन भुजबळ म्हणाले, “जे घडले ते सर्व देशाच्या आणि जगाच्या समोर घडले आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी आधीच स्वतःहून राजीनामा दिला असता, तर या दुर्दैवी गोष्टी घडल्याच नसत्या. पोलिसांचा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतर संपूर्ण देशात पसरलेली संतापाची लाट जगाने पाहिली. धर्मेंद्र प्रधान यांनी आता राजीनामा दिला आहे खरं, पण तो त्यांनी किमान १५ दिवसांपूर्वीच द्यायला हवा होता. सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांनी आणि मार्गदर्शकांनी या विषयावर त्यांच्याशी आधीच गांभीर्याने चर्चा करायला पाहिजे होती.” संताप शांत करण्यासाठी संवादाची गरज देशातील विविध मुद्द्यांवरून जनतेमध्ये पसरलेल्या असंतोषावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, “केवळ विद्यार्थ्यांचेच नाही, तर सोनम वांगचुक यांना देखील तब्बल २६ दिवस उपोषणाला बसावे लागले. या काळात ज्या घटना घडत होत्या, त्यामुळे लोकांच्या मनात तीव्र संतापाची लाट पाहायला मिळाली. आता हा जनसंताप शांत करण्याचे काम सरकारने प्राधान्याने केले पाहिजे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाशी आणि आंदोलकांशी सतत संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे.” जंतर-मंतर ते संसद मोर्चा; पोलिसांकडून लाठीचार्ज नीट पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर ‘कॉकरोज जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन छेडले होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी चकमक झाली. पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर आंदोलकांकडूनही दगडफेक झाल्याचा आरोप झाला. अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत दबाव वाढवला. वाढत्या राजकीय व सामाजिक दबावामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत