Headlines

ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times


Weather Update: राज्यात सर्वत्र १४ जुलै रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पण हवामान विभागाने मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याबद्दल त्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

14 जुलै हवामान अपडेट
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता महाराष्ट्रात कोरडं वातावरण निर्माण झालं आहे आणि तापमानही वाढू लागलं आहे. जुलै महिन्यात मुंबईमध्ये सर्वाधिक पाऊस होतो. रस्ते जलमय होतात आणि वाहतूक व्यवस्था ठप्प होते. महिनाभर मुंबईत सरासरी ९१९.९ मिमी पाऊस होतो. परंतु, या आठवड्यात मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस होणार नाही असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शहरातून पावसाळी ढग गायब झाले असून तापामान वाढू लागलं आहे.

मान्सूनने ब्रेक का घेतला?

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या सक्रिय हवामानाच्या अनुपस्थितीमुळे किमान आठवडा संपेपर्यंत तरी शहरात मुसळधार पाऊस होणार नाही. सध्या मान्सूनची लाट कमकुवत झाली आहे. पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत असल्यामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांना चालना मिळत नाही. त्यामुळे पूर्वेकडील राज्य वगळता संपूर्ण देशभरात कोरडं वातावरण पसरलं आहे. शिवाय मुसळधार पावसाच्या ढगांच्या अनुपस्थितिमुळेही पाऊस होत नाही.

सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांमध्ये कोरडं वातावरण पसरलं आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मान्सूनने विश्रांती घेतली आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात केवळ हलक्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे पसरला. हळूहळू त्याने अरबी समुद्र वर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला व्यापलं. पण कालांतराने तो पट्टा गायब झाला. यामुळे मान्सूनचा जोर कमी झाला आहे असा अंदाज हवामान विभागाचे माजी प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अशीच प्रणाली पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात सक्रिय होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातील पश्चिमेकडून येणारे वारे अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात १७ जुलैपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० जुलैपासून मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकणातील हवामान आज कसं असेल?

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे १४ जुलै, मंगळवार रोजी, संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. १७ जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होईल का?

मंगळवारी दिवसभर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या घाटमाथ्यात पावसाचा जोर वाढू शकतो. परंतू, सोलापूर जिल्ह्यात आज वातावरण पूर्णपणे कोरडं राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र व खान्देशात स्थिती कशी असेल ?

नाशिक जिल्ह्यात आज हलका पाऊस होईल. अहिल्यानगरमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही आज मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesMumbai Water News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये दीडशे दिवसांचाच पाणीसाठा; शहरवासीयांची चिंता वाढली

मराठवाडा व विदर्भातील हवामान कसं असेल?

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होईल. दरम्यान, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडं राहण्याची शक्यता आहे. शिवाय विदर्भात नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही हवामान शांत राहील. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये १६ जुलैपासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तुमच्या जिल्ह्यांत हवामान कसं आहे? कोणकोणत्या भागांत पाऊस सुरू आहे आणि तापमान वाढ कुठे जाणवते आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा