Headlines

आईला न बोलाविल्याने गेली नोकरी


माता-पित्यांचा आदर करणे, याला आपल्या संस्कृतीत अतियश महत्व आहे. प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. भारतीय संस्कृतीप्रमाणेच इतरही अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये माता-पित्यांना देवासमान मानण्यात आले आहे. याच संदर्भात चीन या देशात एक स्वारस्यपूर्ण घटना घडली आहे. येथे एका कर्मचाऱ्याने त्याच्या विवाहाच्या सोहळ्याला त्याच्या मातेला निमंत्रण दिले नाही, या कारणास्तव त्याच्या अधिकाऱ्याने त्याला नोकरीवरुन काढून टाकले आहे. सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली असून, तिच्यावर उलट-सुलट मते व्यक्त होत आहेत.

या कर्मचाऱ्याच्या पित्याचे त्याच्या बालपणीच निधन झाले आहे. त्यानंतर त्याच्या मातेनेच अनेक कष्ट करुन त्याचा सांभाळ केला. त्याला मोठे करुन स्वत:च्या पायावर उभे केले. तथापि, या कर्मचाऱ्याला आपल्या मातेच्या कुरुपपणासंबंधी तिरस्कार आहे. त्यामुळे तो तिचा रागराग करतो. तिला टाळण्याचा प्रयत्न करतो. याच कारणासाठी आपल्या विवाह समारंभाला त्याने आपल्या आईला आमंत्रित केले नव्हते. त्याच्या अधिकाऱ्याला जेव्हा आपल्या कर्मचाऱ्याचा हा कृतघ्नपणा समजला, तेव्हा त्यालाही राग आला. त्याने या कर्मचाऱ्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याला सरळ नोकरीवरुन काढून टाकले आणि त्याच्या आईला कंपनीत नोकरीवर घेतले. नोकरीतून काढल्यानंतर हा कर्मचारी भानावर आला आणि त्याने आपल्या मातेची आणि अधिकाऱ्याचीही क्षमायाचनाक केली. तथापि, क्षमायाचनेनंतरही अधिकाऱ्याने आपला निर्णय स्थगित केला नाही. त्यामुळे आपल्या आईचा तिरस्कार केल्याची शिक्षा या कर्मचाऱ्याला भोगावी लागली आहे. ही घटना सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली असून लोकांनी भिन्नभिन्न मते मांडली आहेत.

काही जणांच्या मते आईशी कसे वागावे, हा त्या कर्मचाऱ्याचा खासगी प्रश्न आहे. त्याने आईला विवाहाला बोलाविले नाही, म्हणून नोकरीवरुन काढणे हा अन्याय आहे. कर्मचाऱ्याची कानउघाडणी केल्याने काम भागले असते. तर काही जणांच्या मते अधिकाऱ्याची कृती योग्य आहे. ज्या आईने पित्याच्या मृत्यूनंतर या कर्मचाऱ्याला कष्ट करुन वाढविले, तिचा केवळ ती दिसायला चांगली नाही. म्हणून तिरस्कार करणे चुकीचे आहे. एकंदर, ही घटना चर्चेचा विषय बनली, हे खरे.

 

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत