चरणोंपर अर्पित है, इसको चाहो तो स्वीकार करो, यह तो वस्तु तुम्हारीही है, ठुकरा दो या प्यार करो।’ सुभद्राकुमारी चौहान यांच्या या ओळी. ईश्वराची पूजा करायला धूप, दीप, नैवेद्य अशा बाह्य उपचारांची गरज नसते. प्रेमानं ओथंबलेलं हृदयही पुरेसं आहे. ते त्याला समर्पित केलं की झालं. समर्पण ही वृत्ती आहे. ही ईश्वराशिवायही अनेक ठिकाणी असते. त्यातलं महत्त्वाचं समर्पण हे मातृभूमीसाठी केलेलं समर्पण. सामान्यपणे समर्पणाचा संबंध त्यागाशी जोडला जातो. त्यातून कधी – कधी ‘मी त्याग केला’ असा सात्विक का होईना, पण एक सूक्ष्मसा अहंकार , त्याग करणाराच्या मनात उत्पन्न होतो.
अहंकार आला की समर्पण संपलंच. समर्पणाचा अर्थ स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे देऊन टाकणं. एकदा समर्पण केलं की कुठल्याही प्रकारे निवड वा तक्रार करण्याचा अधिकार नसतो. जेव्हा पराजित सैन्य जिंकलेल्या देशाच्या सत्तेपुढे आत्मसमर्पण करतं, तेव्हा त्या सैन्याला आपले सर्व निर्णय ज्यांच्यापुढे समर्पण केलं आहे त्या सत्तेच्या मताप्रमाणे घ्यावे लागतात, अनिवार्यपणे. चोर दरोडेखोर – डाकू, असे समाजकंटक देशाच्या शासनापुढे आत्मसमर्पण करतात, तेव्हा त्यांनाही हाच नियम लागू होतो.
भौतिक जगतातलं समर्पण आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं समर्पण यांत खूप फरक आहे. भौतिकातलं समर्पण बरेचदा नाईलाजानं, जबरदस्तीनं किंवा भीतीपोटी केलेलं असू शकतं. काही वेळा पश्चात्ताप झाला, मनपरिवर्तन झालं किंवा आपली चूक समजल्यामुळे ती सुधारावी म्हणूनही असू शकतं. अशावेळी संधी मिळताच मन पुन्हा बंड करून उठू शकतं.
आध्यात्मिक समर्पणात मात्र यापैकी काहीही नसतं. असते ती फक्त मी तुझा आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती आहे, मी स्वतःला तुझ्यावर सोपवलं आहे हा विश्वास आणि माझ्यासाठी जे निर्णय घ्यायचे ते तूच घे, ही भावना. मीराबाईंइतकं समर्पणाचं श्रेष्ठ उदाहरण दुसरं नाही. ‘जहाँ बैठावै तित ही बैठूं, बेचै तो बिक जाऊं।’

