Headlines

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत; बेलापूर, नेरूळ, विमानतळाला जोडणार| Maharashtra Times


Kharghar Coastal Road: नवी मुंबई विमानतळाला मुंबईतील उपनगरांशी जोडणारा या मार्गाचं बांधकाम सिडको करत आहे. यासाठी कंत्रात जे कुमार इन्फ्राला देण्यात आलं असून 2028पर्यंत मार्ग पूर्ण होण्याती शक्यता आहे.

Kharghar coastal road (representative image)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा आणि वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी शहरात दोन कोस्टल रोड उभारले जाणार आहेत. यापैकी एक म्हणजे खारघर सागरी किनारा मार्ग किंवा कोस्टल रोड. सिडकोच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून थेट 10 मिनिटांवर येणार आहे. तसेच, भविष्यात नवी मुंबई विमानतळापर्यंत हाय-स्पीड कनेकटीव्हीटी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

1000 कोटींहून अधिक खर्च

खारघर कोस्टल रोडसाठी तब्बल 1020.70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग 9.678 किमी लांब असून पनवेलच्या खाडीवरून खारघर, सीबीडी बेलापूर आणि नेरूळपर्यंत जोडणार आहे. या मार्गाचं बांधकाम सध्या दोन टप्प्यात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात खारघर ते सीबीडी बेलापूर मार्ग तयार करण्यात येणार असून पुढील टप्प्यात सीबीडी बेलापूर ते नेरूळ जेट्टीपर्यंत रस्ता बांधण्यात येईल. दरम्यान, विमानतळासह हा मार्ग शीव-पनवेल महामार्गाशीही जोडला गेला असेल. त्यामुळे मुंबईतील पूर्व उपनगरं थेट विमानतळापर्यंत जोडली जातील.

Maharashtra TimesMumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास आता होणार बंद, दरवाजे बंद होणारी लोकल झाली सज्ज; मुंबईकडे रवाना

खारघरच्या सेक्टर 16मधील जलमार्गापासून हा कोस्टल रोड सुरू होणार आहे. पनवेल खाडीवरून खारघर स्थानकाजवळील पे हाऊसिंग स्कीमच्या बाजूने सीबीडी बेलापूरमधील सेक्टर 15पर्यंत हा मार्ग जातो. त्यापुढे डीपीएस नेरुळ परिसरात संपतो. कोस्टल रोडमुळे खारफुटी आणि खाडीवर कमीत-कमी परिणाम होण्यासाठी या मार्गाचा काही भाग जमिनीच्या दिशेने वळवण्यात आला आहे.

कसा असेल मार्ग?

खारघर कोस्टल रोडमुळे मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या मार्गांना नवी मुंबई शहर आणि विमानतळाशी जोडणी मिळणार आहे. शीव पनवेल मार्गावर कोस्टल रोड गृहनिर्माण प्रकल्प आणि कॉर्पोरेट पार्कला ही जोडणार आहे. तसेच, खारघरमध्ये नवीन बनत असलेल्या आंतरराष्ट्रीय कोर्पेरेट पार्कशीही थेट जोडणी मिळणार आहे. नेरूळजवळ या मार्गाला पाम बीच रोडशीही थेट जोडणी मिळणार आहे. खारघर कोस्टल रोडमुळे खारघर, सीबीडी बेलापूर आणि नेरुळदरम्यान प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.

Maharashtra TimesMumbai Metro 5: भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो, ठाणे-भिवंडी ‘मेट्रो लाइन 5’ला वेग; डेडलाइनही आली समोर

सिडकोकडून या प्रकल्पाचं काम सुरू असून 2028पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग सहा पदरी असून भविष्यात कोस्टल रोडला अटल सेतूशी जोडण्याचीही शक्यता आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा