Coastal Road Mangroves: २६ किमी लांब वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गासाठी ४५ हजार खारफुटींची झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेला दिल्यानंतर झाडांची पुनर्लागवड होत नसल्याचं चित्र समोर आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘नियोजित वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्गाच्या प्रकल्पात अडथळा ठरणारी खारफुटीची सुमारे ४५ हजार झाडे तोडण्याची परवानगी मिळवण्यात आली असली तरी त्याविषयीच्या कायदेशीर अटींचे पालनच झालेले नाही’, या आरोपांविषयी उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वनविभागासह मुंबई महापालिकेला दिले. तसेच डिसेंबर-२०२५मध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे हमींचे पालन केल्याचा अनुपालन अहवाल देण्याचेही निर्देश दिले.
पुनर्लागवड पूर्ण झाली का?
वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्ग या २६.३ किमी लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खारफुटीची ४५ हजार ६७५ झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेने डिसेंबर-२०२५मध्ये परवानगी मिळवली. मात्र, भरपाई म्हणून वनीकरणांतर्गत लावण्यात येणाऱ्या झाडांच्या बाबतीत देखरेख राहावी, यादृष्टीने सद्यस्थिती अहवाल देणे न्यायालयाने महापालिकेला बंधनकारक केले होते. खारफुटी तोडीला परवानगी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ‘वनशक्ती’ संस्थेने सर्वोच्च न्यायालयात केले होते. मात्र, ते फेटाळण्यात आले. आता, ‘भाईंदर येथे खारफुटींची पुनर्लागवड पूर्ण झाल्याचे राज्य वनविभागाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्या जमिनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. त्याशिवाय अन्य हमींचेही पालन झालेले नाही’, असे निदर्शनास आणणारी नवी याचिका ‘वनशक्ती’ने केली आहे. त्याविषयी सुनावणी घेतल्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला.
‘२६.३ किमी लांबीचा हा रस्ता वर्सोवा आणि भाईंदरला जोडणार आहे. या प्रकल्पाच्या जमिनीवर खारफुटीची अंदाजे ६० हजार झाडे आहेत. त्यापैकी ४५ हजार ६७५ झाडे तोडावी लागणार आहेत. त्या बदल्यात पालघर जिल्ह्यातील ३० हेक्टर क्षेत्रावर एक लाख ३७ हजार २५ रोपांची लागवड करण्यात येतील’, अशी हमी पालिकेने डिसेंबर- २०२५मध्ये दिली होती. मात्र, प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असतानाही पर्यायी झाडे लावणे बंधनकारक असताना त्याचे पालन होत नसल्याचे म्हणणे ‘वनशक्ती’तर्फे ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांच्यातर्फे यांनी मांडले.
‘प्रकल्प रद्द व्हावा किंवा थांबावा, असा आमचा हेतू नाही. मात्र, पर्यायी झाडांच्या हमीचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे’, असे धोंड यांनी निदर्शनास आणले. तर, ‘सर्वोच्च न्यायालयातील अपिलात जे मुद्दे मांडले, तेच पुन्हा मांडण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे. उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाप्रमाणे हमी पालनाविषयी अनुपालन अहवाल सादर केले जाणार आहेत’, असे सरकारतर्फे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला सांगितले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा