Headlines

नरसापूर प्रकरणात ऐतिहासिक निकाल! आरोपीला फाशीची शिक्षा


पुणे – पुण्यातील या नरसापूर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून आज पुणे सत्र न्यायालयात निकाल पार पडला.. आज पुणे सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे.. या संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या नरसापूर प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले होते.

‘हे कृत्य करताना त्याला भीती वाटली नाही’ : कोर्ट

आज पुणे सत्र न्यायालयात या प्रकरणाचा अंतिम निकाल पार पडला. निकालपत्र वाचून दाखवताना न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दांत आरोपीच्या कृत्याचा निषेध केला आणि महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने म्हटले की, नरसापूर येथील हे प्रकरण ‘अतिशय दुर्मिळ’या वर्गवारीत मोडणारे आहे. आरोपीने अत्यंत शांत डोक्याने,  प्लॅन  रचून हे अमानुष कृत्य केले आहे. चिमुकलीचे अपहरण आणि तिच्यावर अत्याचार करताना या नराधमाच्या मनात कसलीही भीती नव्हती.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी

सुनावणी दरम्यान कोर्टाने आरोपीच्या भयानक भूतकाळावर आणि विकृत मानसिकतेवर प्रकाश टाकला. न्यायालयाने म्हटले की, या आरोपीने साधारण १२ वर्षांपूर्वी स्वतःच्याच घरातील एका मुलीवर अत्याचार केला होता. एवढेच नव्हे तर, एका वृध्दमहीलेवर हल्ला देखील केला होता.. एवढे गंभीर गुन्हे करूनही आरोपीच्या वर्तनात किंवा मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही, असे गंभीर निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

‘वय ६५ वर्ष आहे म्हणून सहानुभूती नाही’; कोर्ट

न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपीच्या वयाचा दाखला देत एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. कोर्टाने म्हटले की, या घटनेने ‘निर्भया’ प्रकरणाप्रमाणेच संपूर्ण समाजाचे मन हेलावून टाकले आहे. जर आरोपी तरुण असता, तर कदाचित त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विचार केला गेला असता; परंतु आरोपीचे वय पाहता (६५ वर्षे) त्याला सुधारण्याची कोणतीही संधी उरलेली नाही. गुन्हा करूनही त्याच्यात कोणताही बदल जाणवला नसल्याने अशा व्यक्तीला समाजात ठेवणे अत्यंत धोक्याचे आहे. त्याचे वय ६५ वर्षे आहे म्हणून त्याच्यावर कोणीही सहानुभूती दाखवणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याला थेट फाशीची शिक्षा सुनावली.

काय होते संपूर्ण प्रकरण?
पुण्यातील नरसापूर येथे एक लहान चिमुकली तिच्या आजीच्या घरी सुट्ट्या घालवण्यासाठी आली होती. यावेळी शेजारीच राहणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळे याने तिच्यावर पाळत ठेवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता आणि आरोपीला कठोरतम शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. आज न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबाला न्याय देत नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्याने कायद्याचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत