Devdutt Padikkal IND vs SL Test, Player Of The Series : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतकांसह प्लेअर ऑफ द सीरीज ठरलेल्या देवदत्त पडिक्कलने आपल्या फलंदाजीच्या स्थानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. नंबर-३ची जागा मिळाली नाही तरी देशासाठी खेळणं सर्वात महत्त्वाचं असल्याचे त्याने सांगितले.

नंबर ३ वर दावेदार
श्रीलंकेविरुद्धच्या तीन डावांत पडिक्कलने १६७, ४४ आणि ११७ अशा धावा कुटून कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर आपली दावेदारी अत्यंत भक्कम केली आहे. विशेष म्हणजे, भारताचा या जागेवरील नियमित फलंदाज साई सुदर्शन दुखापतग्रस्त झाल्यामुळेच पडिक्कलला या मालिकेत अचानक संधी मिळाली होती.
पण आता मिळालेल्या या सुवर्णसंधीचे पडिक्कलने ज्या प्रकारे सोने केले आहे, ते पाहता नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेतही तोच आपली जागा कायम राखण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संघातून बाहेर असलेल्या साई सुदर्शनसाठी आता कमबॅक करणे अत्यंत कठीण झाले असून, त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“देशासाठी कुठेही खेळायला तयार”
सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना पडिक्कलने आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. तो म्हणाला, “खरं सांगायचं तर, संघासाठी धावा काढण्यात मला सर्वाधिक आनंद मिळतो. मी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतोय, याने मला काहीही फरक पडत नाही. तो तिसरा क्रमांक असो किंवा इतर कोणताही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या संघाचा विजय. जोवर मी त्या विजयात माझे योगदान देत आहे, तोवर मी पूर्णपणे समाधानी आहे.”
“अजून खूप काही शिकायचे बाकी”
कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या युवा संघाबाबत आणि भविष्यातील आव्हानांबाबत बोलताना पडिक्कल म्हणाला, “आम्हाला अजून खूप मेहनत करायची आहे. तुम्ही पाहू शकता, हा आमचा अत्यंत युवा संघ आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यातून आपण काहीतरी नवीन शिकत राहणे महत्त्वाचे आहे. आमच्यापैकी प्रत्येकाला अजून खूप प्रगल्भ व्हायचे आहे आणि त्यासाठी सर्वच जण भुकेले आहेत. मला खात्री आहे की आम्ही अशीच सुधारणा करत राहू आणि आगामी काळात आणखी दमदार सामने खेळू.”
कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला विजयाने मालिकेचा शेवट करता आला नाही, याची खंत असली तरी या मालिकेतून खूप काही मोठे धडे शिकायला मिळाल्याचे पडिक्कलने प्रांजळपणे कबूल केले. केएल राहुल आणि पडिक्कलने फलंदाजीत गाजवलेले वर्चस्व आणि कर्णधार गिलने गोलंदाजांचे केलेले कौतुक पाहता, टीम इंडियाची भविष्यातील वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचेच चित्र दिसत आहे.

