Headlines

चिनी जोडीला धूळ चारताच कोर्टवरच मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू; भारताच्या लेकींनी १५ वर्षांचा हिशेब चुकता केला


Trisha Jolly, Gayatri Gopichand, BWF World Championship 2026 : बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप २०२६मध्ये त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी मोठा पराक्रम केला. चीनच्या बलाढ्य जोडीला हरवत भारताचे पदक पक्के केले.

BWF World Championship 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिप २०२६ ( Badminton World Championships 2026 ) च्या मैदानातून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी केवळ आनंदाचीच नाही, तर डोळ्यांच्या कडा ओलावणारी बातमी समोर आली आहे. भारताच्या महिला दुहेरी संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात चीनच्या बलाढ्य जोडीला नमवून भारताचे पदक निश्चित केल्यावर ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या युवा जोडीला अक्षरशः अश्रू अनावर झाले.

विजयाचा तो भावुक क्षण

सामन्यातील शेवटचा गुण मिळवताच ट्रीसा आणि गायत्री यांनी कोर्टवरच एकमेकींना घट्ट मिठी मारली. गेली अनेक वर्षे घेतलेली मेहनत आणि १५ वर्षांचा भारताचा पदकांचा वनवास संपवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दोघींच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. चीनच्या घरच्या मैदानावर, हजारो चिनी प्रेक्षकांच्या गर्दीत भारताचा झेंडा दिमाखात फडकताना पाहून या दोन्ही २३ वर्षीय खेळाडू कमालीच्या भावुक झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिले.

Maharashtra TimesAyush Shetty : आत्मविश्वास असावा तर असा! चीनचा जगज्जेता शि युकीला 21 वर्षांच्या आयुष शेट्टीने सांगून हरवलं, भारताच्या छाव्याचा जगभरात डंका

चिनी जोडीचा असा उडवला धुव्वा

कोणत्याही मानांकनाविना (Unseeded) मैदानात उतरलेल्या ट्रीसा आणि गायत्री या भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जिया यीफान आणि झांग शू शियान यांच्यावर १६-२१, २१-१५, २१-१३ असा रोमहर्षक विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतरही भारतीय तरुणींनी कोणतीही हार न मानता शानदार ‘स्मॅश’ आणि अचूक ‘नेट प्ले’च्या जोरावर जबरदस्त पलटवार केला. तब्बल ६९ मिनिटे चाललेल्या या थरारक सामन्यात भारतीय जोडीने आपला दबदबा सिद्ध केला. विश्वचॅम्पियनशिपच्या नियमांनुसार, उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या दोन्ही जोड्यांना किमान कांस्यपदक दिले जाते, त्यामुळे ट्रीसा आणि गायत्री यांचे पदक आता पक्के झाले आहे.

१५ वर्षांचा वनवास अखेर संपला

भारतीय जोडी इतकी भावुक होण्यामागे एक मोठे कारण होते, ते म्हणजे तब्बल १५ वर्षांनंतर बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपच्या महिला दुहेरीत भारताच्या खात्यात पदकाची नोंद होत आहे. याआधी २०११ मध्ये लंडन येथे झालेल्या विश्वचॅम्पियनशिपमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या जोडीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता गायत्री आणि ट्रीसाने हा दुष्काळ संपवला आहे. गायत्री ही भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची कन्या असून, तिने आपल्या वडिलांचा वारसा अत्यंत समर्थपणे पुढे नेला आहे.

Maharashtra TimesMedhavi Bidhuri Celebration Video : मेधावीने मैदान गाजवलं अन् नेटीझन्सच्या पडल्या विकेट; पण ट्रेंडला आलेलं सेलिब्रेशन तिचं नाहीच! मग नेमकं कोणाचं?

चार वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला चारली धूळ

ही लढत सोपी नव्हती. भारतीय जोडीने ज्या चिनी जोडीला हरवून हा भावुक विजय मिळवला, त्यातील जिया यीफान ही महिला दुहेरीतील एक दिग्गज खेळाडू आहे. तिने याआधी तब्बल ४ वेळा विश्वचॅम्पियनशिपचे सुवर्णपदक जिंकले असून, तिच्या नावावर ऑलिम्पिकचे सुवर्ण आणि रौप्यपदकही आहे. निवृत्त झालेली तिची जुनी साथीदार चेन किंगचेन हिच्याऐवजी जियाने झांग शू शियानसोबत नवी जोडी बनवली होती. मात्र, या नव्या चिनी जोडीला भारतीय तरुणींनी त्यांच्याच देशात धूळ चारली आणि भारताच्या क्रीडा इतिहासात एका सुवर्णपानाची भर घातली.