Headlines

गणपती रेल्वे आरक्षण काही मिनिटात फुल्ल!


‘रिग्रेट’ने गणेशभक्तांची कोंडी, 12 ते 19 सप्टेंबरपर्यंतच्या प्रवासाचे आरक्षण आजपासून खुले

राजू चव्हाण/ खेड

यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण सोमवारपासून सकाळी 8 वाजता खुले झाले. आरक्षण खुले होताच अवघ्या दोन ते तीन मिनिटातच कोकणकन्या, तुतारी, मांडवी, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेससह मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस या नियमित गाड्या पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाल्या. नियमित गाड्यांची आसन क्षमताच संपल्याने ‘रिग्रेट’चा शेरा मिळाला. यामुळे पहिल्याच दिवशी गणेशभक्तांची कोंडी होऊन पदरी निराशाच पडली.

गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी डेरेदाखल होतात. रेल्वे प्रशासनाने यंदा 60 दिवस अगोदरच म्हणजेच 13 जुलैपासून आरक्षणाची दालने खुली आहेत. त्यानुसार कोकणवासियांची गणेशोत्सवात गावी जाण्याकरिता आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी सकाळपासूनच तिकिट खिडक्यांवर एकच गर्दी उसळली. मात्र अवघ्या दीड मिनिटातच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. यामुळे असंख्य कोकणव़ासीय प्रतीक्षा यादीवरच राहिले आहेत.

कोकण मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या, मत्स्यगंधा, मांडवी, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, सुपरफास्ट मुंबई-मडगाव एक्स्प्रेस गाड्यांची गणेशोत्सवातील आसन क्षमताच पहिल्याच दिवशी संपली. यामुळे या सर्व गाड्यांचे शेकडो गणेशभक्त प्रतीक्षा यादीवरच राहिले आहेत. 4 नियमित गाड्यांमध्ये पहिल्याच दिवशी काही मिनिटातच तिकिटे संपल्याने गणेशभक्तांची चिंता वाढली आहे.

12 ते 14 सप्टेंबरदरम्यानच्या प्रवासाचे आरक्षणही 14 जुलैपासून खुले होणार असल्याने त्या दरम्यानही आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी कोकणवासियांची कसोटीच लागणार आहे. गतवर्षी रेल्वे प्रशासनाने तब्बल 380 विशेष फेऱ्या चालवत गणेशभक्तांना दिलासा दिला होता. यंदाच्या गणपती स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा आणि त्यांचे आरक्षण जुलै महिन्याच्या उत्तरार्धात किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई-चिपळूणसह मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याची मागणी देखील केली जात आहे. तशी निवेदनेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाला देण्यात आली आहेत. केवळ निवेदने देवून न थांबता सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. रेल्वे बोर्ड सकारात्मक निर्णय घेवून गणेशभक्तांना दिलासा देईल, अशी आशाही गणेशभक्त बाळगून आहेत.

गर्दी व्यवस्थापनासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात आल्याने कोकणवासियांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केल्यास नियमित गाड्यांच्या प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना आरक्षित तिकिटे पदरात पडून गावी येण्याचा मार्ग सुकर होईल, असा सूरही गणेशभक्तांकडून आळवला जात आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाही दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही गणेशभक्तांकडून आतापासून जोर धरू लागली आहे.

आरक्षण वेळापत्रक

 

प्रवास तारीख                                                            आरक्षण सुरू होण्याची तारीख

12 सप्टेंबर                                                                 14 जुलै

13 सप्टेंबर                                                               15 जुलै

14 सप्टेंबर (गणेश चतुर्थी)                                            16 जुलै

19 सप्टेंबर(गौरी गणपती विसर्जन)                                  21 जुलै

सर्व विशेष गाड्या 24 डब्यांनी चालवाव्यात

नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण भरल्यामुळे आता गणपती विशेष गाड्यांची अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व विशेष गाड्या 24 डब्यांनी चालवाव्यात. तसेच संपूर्ण अनारक्षित गाड्यांमुळे केवळ सुऊवातीच्या स्थानकातील प्रवाशांची सोय होत असल्यामुळे चिपळूण, खेडप्रमाणेच महाड आणि माणगाव येथूनही काही गाड्यांची व्यवस्था करावी.

 

                                                    अक्षय महापदी

                                                रेल्वे अभ्यासक, कळवा-ठाणे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत