Headlines

आयर्लंडनंतर इंग्लंडने धडा शिकवला, आता झिम्बाब्वेची धमकी; टीम इंडियाला मोठं आव्हान, मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर काय म्हणाला?


IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेपूर्वी सिकंदर रझाने दोन्ही संघांना समान संधी असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून भारतीय संघाच्या मानसिकतेवर चर्चा सुरू झाली आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांनंतर टीम इंडियावर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान आहे.

India vs Zimbabwe T20 series
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होण्याआधीच सिकंदर रझाच्या एका वक्तव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या मालिकेत दोन्ही संघांना विजयाच्या समान संधी असल्याचं रझाने म्हटलं आहे. टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी हे वक्तव्य एक प्रकारचं आव्हान मानलं जात आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्धची मालिका टीम इंडियासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी ठरणार आहे.

सिकंदर रझाने भारताला दिलं आव्हान

सिकंदर रझाने भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेत दोन्ही संघांच्या विजयाच्या समान संधी असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. भारतासारख्या मोठ्या संघाविरुद्ध खेळताना अनेक संघ आधीच पराभव स्वीकारल्यासारखी वक्तव्य करायचे. मात्र, आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. झिम्बाब्वेचा संघ भारताविरुद्ध आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मालिकेत अपेक्षेप्रमाणे सहज विजय मिळेलच, असं मानणं योग्य ठरणार नाही.

‘आयर्लंडने आम्हाला रिअॅलिटी चेक दिला’

भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या मालिकेपूर्वीच्या वक्तव्यावरही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. आयर्लंडविरुद्ध झालेल्या पराभवातून टीम इंडियाला रिअॅलिटी चेक मिळाला असल्याचं श्रेयसने मान्य केलं होतं. तसंच, झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना संघातील नव्या खेळाडूंना परिस्थिती समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल, असंही त्याने सांगितलं. मात्र, या वक्तव्यांमधून भारतीय संघाची मानसिकता बचावात्मक असल्याची टीका केली जात आहे. भारत हा टी-२० विश्वचषक विजेता संघ आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेत अपयशाची कारणं देण्यापेक्षा मैदानावर कामगिरी करून दाखवणं अपेक्षित असल्याचं मत व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesDavid Warner : मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा डेव्हिड वॉर्नरने कबूल केला; आता पुढे काय होणार, वकिलाने सांगितलं नेमकं काय घडलं?

मालिकेपूर्वी अय्यर नेमकं काय म्हणाला?

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील अनुभवातून भारतीय संघाने बरंच काही शिकल्याचं कर्णधार श्रेयस अय्यरने म्हटलं आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी बोलताना त्याने संघाला परिस्थितीशी लवकर जुळवून घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे, युवा खेळाडूंनी अपयशाची भीती मनात ठेवू नये, असा सल्लाही श्रेयसने दिला. त्याच्या मते, अपयशाची भीती मनात असेल तर खेळाडू बचावात्मक पवित्रा घेतो आणि त्यामुळे त्याच्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येत नाही. आयर्लंडमध्ये भारतीय संघ परिस्थिती समजून घेण्यात कमी पडला होता, असं त्याने मान्य केलं. मात्र, त्या अनुभवातून वास्तवाची जाणीव झाली. इंग्लंडमधील काळही संघासाठी खडतर होता. पण या दोन्ही दौऱ्यांमधून काही सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या, असं श्रेयसने सांगितलं.

मैदानात उतरल्यानंतर परिस्थितीनुसार समयसूचकता, जागरुकता आणि जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. मागील दौऱ्यांमध्ये निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागले नसले, तरी त्यामुळे संघातील खेळाडू आणखी जवळ आल्याचं श्रेयसने सांगितलं. पुढे जाताना संघाने कशा पद्धतीने क्रिकेट खेळायला हवं, यावरही चर्चा झाल्याचं त्याने म्हटलं. झिम्बाब्वेविरुद्धचं आव्हानही सोपं नसेल. संघातील अनेक खेळाडू पहिल्यांदाच या ठिकाणी खेळणार आहेत. त्यामुळे परिस्थितीशी जितक्या लवकर जुळवून घेता येईल, तितका चांगला निकाल मिळवण्याची संधी असेल, असं श्रेयसने सांगितलं.

‘मलाही युवा खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी हवी’

श्रेयस अय्यरचाही हा पहिलाच झिम्बाब्वे दौरा आहे. त्यामुळे तो स्वतःही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कर्णधार म्हणून युवा खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचं आपलं लक्ष्य असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Maharashtra TimesHarbhajan Singh : वैभव सूर्यवंशीने राहुल द्रविडला एकच उत्तर दिलेलं, मैदानातही तेच केलं! हरभजनने सांगितला बॉस बेबीचा भन्नाट किस्सा, काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशीवरही असेल दबाव

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवरही विशेष लक्ष असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. आता झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांच्याकडून भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.

झिम्बाब्वेची गोलंदाजीही आव्हान देणार

झिम्बाब्वेच्या संघात सिकंदर रझासोबत रिचर्ड एनगारवा, ब्लेसिंग मुजरबानी आणि ब्रॅड इव्हान्स यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेच्या गोलंदाजीला कमी लेखणं भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाजांना हार्ड लेंथच्या चेंडूंवर अडचणी आल्या होत्या. झिम्बाब्वेचे गोलंदाजही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.

Maharashtra TimesLalit Modi : ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतणार! न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाला?

भारताला मालिका जिंकण्याचं आव्हान

टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाला या फॉरमॅटमध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. भारताला ही मालिका ३-० अशी जिंकायची असेल, तर प्रत्येक विभागात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. सिकंदर रझाने दिलेलं आव्हान चुकीचं ठरवायचं असेल, तर टीम इंडियाला ते आता मैदानावरच सिद्ध करावं लागणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा