Why Americans Never Fight Over Food at Parties: अमेरिकेतील समारंभांमध्ये पाहुणे आवश्यक तेवढंच जेवण घेतात. त्यामुळे जेवणासाठी भांडणं होत नाहीत. तसेच, लोक जेवणासाठी नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी येतात, असा अनुभव अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

काय म्हणाली महिला?
हा व्हिडीओ samiksha_in__america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ‘अतिथी देवो भव’ ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. मात्र, काही कार्यक्रमांमध्ये जेवणावरून गोंधळ किंवा हाणामाऱ्या झाल्याच्या घटना समोर येतात. याउलट, अमेरिकेत असे प्रकार सहसा घडत नाहीत. कारण तेथील लोक जेवण घेताना आवश्यक तेवढेच पदार्थ ताटात वाढून घेतात. अगदी अमर्याद जेवणाची व्यवस्था असली, तरीही बहुतांश लोक प्रत्येक पदार्थ एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळाच घेतात. त्यामुळे प्रत्येकाला सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.
(फोटो सौजन्य – Jep Gambardella/pexels.com)
जेवण उरलं तर पुन्हा घेतात
या भारतीय महिलेच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन लोक कार्यक्रमात केवळ जेवणासाठी येत नाहीत, तर यजमानांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी येतात. तसेच, एखाद्या आमंत्रित व्यक्तीसोबत अतिरिक्त पाहुणा येणार असेल, तर त्याची माहिती आधीच फोन करून दिली जाते. त्यामुळे यजमानांना योग्य नियोजन करता येतं. सर्वांनी जेवण झाल्यानंतर अन्न उरलं, तर लोक पुन्हा आवश्यक तेवढे पदार्थ घेतात.
हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत, अशी अन्नाबाबतची शिस्त भारतातही रुजावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

