Headlines

Raj Thackeray Uddhav Thackeray Press Conference on CJP Protest Dharmendra Pradhan Narendra Modi; सरन्यायाधीशांनी झुरळांना जन्म दिला, मग पोरांकडे लक्ष द्यायला नको? राज ठाकरे चिडले, प्रधान-पंतप्रधानांना हटवण्याची मागणी


Raj Thackeray And Uddhav Thackeray Press Conference: सरन्यायाधीशांनी विद्यार्थी आंदोलनातील व्हिडिओ पाहायला वेळ नसल्याचं सांगितल्यावरुन निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की ‘यांनी झुरळांना जन्म दिला, मग पोराकडे बघायला नको का?’

Raj Thackeray Uddhav Thackeray Maharashtra Times (4)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : देशभरात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरेसेना आणि मनसेकडून रविवार २६ जुलै रोजी सकाळी दहा वाजता मुंबईत विद्यार्थ्यांसह शक्तिप्रदर्शन मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. सरन्यायाधीशांनी विद्यार्थी आंदोलनातील व्हिडिओ पाहायला वेळ नसल्याचं सांगितल्यावरुनही राज ठाकरेंनी निशाणा साधला. ‘झुरळांना जन्म दिला, मग पोराकडे बघायला नको का?’ असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

राज ठाकरे काय म्हणाले?

“आता हा विषय प्रधानांपुरता मर्यादित राहिला नाही, तर पंतप्रधानांपर्यंत गेला आहे. अनेक आंदोलनांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हा कुठला सत्तेचा माज आहे? नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट-त्रास हे लागतात, हे विचारा. माझा जुना व्हिडिओ पाहा, तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणालो होतो, की आज शेतकरी आत्महत्या करत आहेत उद्या विद्यार्थी करतील, दुर्दैवाने ते खरं ठरत आहे. ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसली नाहीत, त्यांच्याही आई वडिलांना त्रास होत आहे” असं राज ठाकरे म्हणाले.

२६ जुलै रोजी विद्यार्थ्यांसह शक्तिप्रदर्शन मोर्चा काढणार आहोत. ठाकरे बंधूंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षालाही सहभागासाठी निमंत्रण दिलं आहे. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार असून, देवाला साकडं घालणार की सरकारला सुबुद्धी दे, असं राज ठाकरे म्हणाले.

सरन्यायाधीशांवर ताशेरे

“सरन्यायाधीशांचा व्हिडिओ पाहिला की आंदोलकांचे व्हिडिओ पाहायला वेळ नाही, त्यांनीच झुरळांना जन्म दिला. जन्म दिला मग पोराकडे बघायला नको?” असा सवाल राज यांनी विचारला.

“आंदोलनात सहभागी झाल्यास खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी पोलीस विद्यार्थ्यांना देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. ब्लॅकमेल करणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ आयुक्तांना पाठवणार आहे, असंही ते म्हणाले. यांनी चुका केल्या की राजकारण नाही करायचं, हे विरोधात गेले की राजकारण, असं कसं?” असं राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मी जंतरमंतरला गेलो, तिथे एक मध्यमवयीन तरुण होता. तो म्हणाला, की माझा व्यवसाय नीट सुरु होता, पण नोटबंदीने वाटोळं झालं. गेल्या काही वर्षातील राग उफाळून आला आहे. न्यायालयाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. दिल्लीत मुलींचे कपडे फाडले, लाठ्यांना गंजलेले खिळे लावून डोकं फोडलं. सरकारला कबुतर कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे, कॉक्रोचकडे पाहायला वेळ नाही” अशी नाराजी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्वीटला अर्थ नाही. त्यांनी येऊन बोलायला पाहिजे होतं. हा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापुरता विषय नाही, लोकांना सरकार नकोय. सिद्धिविननायकाला साकडं घालणार की सरकारला सुबुद्धी दे किंवा सरकारच बदल. पहिल्या दिवशी चर्चेला बोलावलं असतं तर आंदोलन ताणलं गेलं नसतं. अनेक वर्षांचा असंतोष उफाळून आला आहे, त्याला आम्ही वाट करुन देतोय” असंही उद्धव म्हणाले.