Headlines

Manoj Jarange Patil Big Warning To Maharashtra Government Over Maratha Reservation


मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकारचा 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण तो प्रयत्न करु नका. अन्यथा रस्ते बंद होतील, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, तुम्ही अंतरवालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो. सरकार सांगत असलेली माहिती खरी की आम्ही सांगत असलेली माहिती खरी, याचा निर्णय समाजच घेईल,असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला.

मनोज जरांगे यांनी सरकारच्या विविध दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “29 ऑगस्ट 2025 पासून आजपर्यंत समितीने एकही नवीन नोंद शोधलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सहा महिन्यांत 58 लाख नोंदी शोधल्या, मग आता प्रक्रिया का थांबली?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

जरांगेंचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, एकही नोंद कमी करू नका. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि रस्ते बंद झाले तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगेंची विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांवर टीका

“विखे पाटील हे आपल्याला शोभत नाही. मराठा समाज खूप मोठा आहे. 29 ऑगस्ट 2026 ला एक वर्ष पूर्ण होत आहे. मराठा समाजाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला हे तुमच्या लक्षात नाही. तुम्ही एखाद्या गरीब समाजाला, जो समाज प्रामाणिक आहे, जो लेकराबाळांच्या भविष्यासाठी तरसतोय, त्या समाजाच्या लेकरांचं इतकं वाटोळ करण्याचं आणि मराठा समाजाच्या लेकरांना टार्गेट करण्याचं काम फडणवीस साहेबांनी करायला नको”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

“आम्ही प्रामाणिकपणाने सरकार म्हणून तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो, ज्या मराठा समाजाने जीवाचं पाणी करुन तुम्हाला सत्तेवर बसवलं आणि मोठं केलं, त्यांच्या लेकरांची इतकी हेळसांड तुमच्याकडून होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांना दुखावलं नाही’

“एक वर्ष झालं मी एकही शब्दाने मुख्यमंत्र्यांना दुखावलेलं नाही. कारण आम्हाला वाटलं होतं की, आता विखे पाटील यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मुलांची अश्रू पुसतील, त्यांचे भविष्य धोक्यात आणणार नाहीत. तुम्ही नुसता जीआर काढला पण सोयीसुविधा लागू केल्या नाहीत. इतकं तरी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं पाहिजे.”

“तुम्ही मराठा समाजाचा हैदराबादचा जीआर काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. पण जात प्रमाणपत्र तुम्ही वाटप करत नाहीत. विखे पाटील मोठ्या उमेदीने सांगत आहेत की आम्ही अमूक केलं. या समाजाने डोळे झाकून तुमच्यावर विश्वास टाकला होता. तुम्ही अंतरवलीत या. मी सोक्षमोक्ष करुन दाखवतो.”

‘तुम्हाला 29 तारखेला दिसेल’

“भाजपने फसवलं असं आता समाजालादेखील वाटत आहे. सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा निर्णय घेण्यासाठी एक महिना मागितला होता. पण आता एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. आमचं मराठ्यांचं कोणतं चुकीचं पाऊल आहे? तुम्ही 29 ऑगस्टचा दिवस उगवू देऊ नका. भाजप आम्हाला आरक्षण देत नसेल तर आम्ही गप्प का बसायचं? तुम्ही मराठा समाजाला इतकं टार्गेट केलं की, प्रमाणपत्र मिळू देत नाहीत. मराठा समाज गप्प कसा बसेल? तुम्हाला आता 29 तारखेला दिसेल.”

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा